पावसाळा संपला तरी शहरातील रस्त्यांवर खड्डे कायम
०८ नोव्हेंबर २०२२
पिपरी
पावसाळा संपला तरी, अद्याप शहरातील बहुतांश भागांतील रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. वारंवार तक्रारी करूनही खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. खड्डयामुळे लहान-मोठे अपघात होत असून, वाहनचालक जखमी होत आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी रस्ते तातडीने योग्य प्रकारे दुरूस्त करावेत, अशी तक्रार जनसंवाद सभेत सोमवारी (दि. ७) करण्यात आली. ८८ नागरिकांनी केल्या तक्रारी महापालिकेच्या सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या सभेत एकूण ८८ नागरिकांनी १२५ पेक्षा अधिक तक्रारी मांडल्या. त्यात वरील तक्रारीही अनेक नागरिकांनी केल्या.
पावसाळ्याची उघडीप मिळाल्यानंतर तातडीने खड्डे बुजविणे गरजेचे होते. मात्र, अद्यापही शहरातील बहुतांश रस्त्यांवरील खड्डे कायम आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी मोठी गैरसोय होत आहे. पदपथांवरील पेव्हिंग ब्लॉक तत्काळ बसवा तसेच, विविध कामांसाठी रस्ते खोदून ठेवले असून, त्यांची दुरूस्ती व्यवस्थित केली जात नाही. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण केली जावीत, रस्त्याच्याकडेला पदपथांवर उभारण्यात आलेले अतिक्रमण काढावे आणि त्याठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी, पदपथांवरील राडारोडा उचलावा, पदपथांवरील निघालेले पेव्हिंग ब्लॉक तात्काळ बसवावेत, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या.