मंत्री दोनच, शासन निर्णय साडेसातशे
आपला आवाज न्यूज नेटवर्क
०४ ऑगस्ट २०२२
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन एक महिना उलटला असली तरी अद्याप मंत्रीमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. असे असले तरी शिंदे आणि फडणवीस यांनी निर्णयांचा धडाका लावला असून गेल्या महिनाभरात त्यांनी जवळपास साडेसातशे शासन निर्णय काढले आहेत. त्यात सार्वजनिक विभागाच्या ९१ तर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागासंबंधी ८३ निर्णयांचा समावेश आहे.मंत्रीमंडळ विस्तार होत नसल्याने विरोधकांकडून टीका होत असली तरी मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यभर दौरे सुरू केले आहेत. तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठका आणि भेटीगाठींवर भर दिला आहे. हे सर्व सुरू असताना शिंदे सरकारने निर्णयांचा मात्र मोठ्या प्रमाणात धडाका लावला आहे. या शासन निर्णयात आरोग्य विभागाच्या सर्वाधिक ९१ तर, पाणीपुरवठा विभागासंबंधी ८१ निर्णयांचा समावेश आहे. १२ जुलै रोजी सर्वाधिक, ७० शासन निर्णय प्रसारित झाले असून त्यात पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या ३६ निर्णयांचा समावेश आहे.
शिंदे गटात दाखल झालेले गुलाबराव पाटील यांच्याकडे आधीच्या सरकारमध्ये पाणीपुरवठा विभाग होता.सार्वजनिक आरोग्य विभागासंबंधी ९१, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागासंबंधी ८३, सामान्य प्रशासन विभागासंबंधी ६३ शासननिर्णय घेण्यात आले. तर, शालेय शिक्षण व क्रीडा विभागासंबंधी ५०, महसुली व वन विभागासंबंधी ४४, जलसंपदा विभागासंबंधी ४१, कृषी विभागासंबंधी ३५ निर्णय घेण्यात आले. सर्वांत कमी निर्णय हे मराठी भाषा विभागासंबंधी घेण्यात आले आहेत. पर्यावरण विभागासंबंधी केवळ दोन शासन निर्णय काढण्यात आले आहेत.