नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
शरद बुट्टे, आशाताई बुचके यांची पत्रकार परिषदेत माहिती
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या ९ वर्षात केलेले काम सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी घर चलो अभियान आणि बूथ सशक्तीकरणसाठी गुरुवार दि १२ ऑक्टोबरला नारायणगाव येथे संवाद कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे यांनी दिली .
वारूळवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बुट्टे बोलत होते .यावेळी भाजपच्या नेत्या आशा बुचके,भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष खैरे ,जिल्हा सचिव आशिष माळवदकर आदी उपस्थित होते . प्रत्येक विधानसभेतील सुपर वॉरियर्स कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दि १२ ऑक्टोंबर रोजी शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत असून जुन्नर,आंबेगाव आणि खेड – आळंदी विधानसभेतील कार्यकर्त्यांशी नारायणगाव येथे तर शिरूर – हवेली, हडपसर आणि भोसरी विधानसभेतील कार्यकर्त्यांशी भोसरी येथे असे मिळून १ हजार प्रमुख कार्यकर्त्यांची ते थेट संवाद साधणार आहेत. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, लोकसभा प्रवास योजना राज्यसेवेचे संजय भेगडे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील , मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, आमदार राहुल कुल,आमदार महेश लांडगे यांचेसह पक्षाचे तालुका जिल्हा आणि राज्यपातळी अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
नारायणगाव येथे प्रदेशाध्यक्ष सर्व प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांसह सामान्य व्यावसायिक, शेतकरी,महिला,युवक, बारा बलुतेदार, अनुसूचित जाती जमाती यासह विविध समाज घटकांशी थेट संवाद करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या लोकहिताच्या योजना लोकांपर्यंत पोहोचत असताना ते सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेणार आहेत.

