दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या कामांवर प्रेम व्यक्त करावे; पंकजा मुंडे यांचे आवाहन

पिंपरी, दि. 20

– दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी शहरातील प्रश्नांसाठी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते भाजपमध्ये आले आणि राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता आली. युतीची सत्ता आल्यानंतर पिंपरी-चिंचवडचे सर्व प्रश्न सोडवण्यात आले. आताच्या सरकारने शास्तीकराचा प्रश्नही कायमचा सोडवला आहे. चिंचवडच्या जनतेने अश्विनी लक्ष्मण जगताप यांना साथ देऊन दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या राजकीय कारकि‍र्दीवर आणि त्यांनी केलेल्या विकासकामांवर प्रेम व्यक्त करावे, असे आवाहन भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी केले.

चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजप-शिवेसना व मित्र पक्षाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ रहाटणीतील विमल गार्डनमध्ये सभा झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अश्विनी लक्ष्मण जगताप, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे शहराध्यक्ष स्वप्निल कांबळे, राज्याच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष भारत महानवर यांच्यासह भाजप, शिवसेना, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना आणि प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “दिवंगत गोपीनाथ मुंडे खासदार झाले आणि केंद्रात मंत्री झाले. त्यानंतर सहाव्या दिवशीच त्यांचा मृत्यू झाला. या धक्क्यातून आमच्या कुटुंबांसह त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांना सावरता आले नाही. गेलेल्या माणसाची जबाबादारी सांभाळताना काय कसरत करावी लागते याची मला जाणीव आहे. आज दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनाही तशीच कसरत करताना मी पाहिले आहे. पती आपल्यामध्ये नाही हे दुःख बाजूला ठेवून संयम आणि जबाबदारीने त्या वागत आहेत. लोकांसमोर बोलत आहेत. एक स्त्री म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो.

आज मी दिवंगत लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथे आले आहे. त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या पाठीशी एक बहीण म्हणून उभे राहण्यासाठी मी आले आहे. माझा बाप अचानक गेल्यानंतर मला जनसेवेसाठी वाघीण व्हावे लागले. अश्विनी जगताप या सुद्धा वाघीणच आहेत. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी अनेक वर्षे सेवा केली. लक्ष्मणभाऊंनी शून्यातून विश्व निर्माण केले. पिंपरी-चिंचवडचा विकास करताना लक्ष्मण जगताप लढले. ते अपक्ष आमदार असताना काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते. आमदारकीची राजीनामा देऊन ते भाजपमध्ये आले. भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांनी शहरातील प्रलंबित आणि किचकट प्रश्न सोडवले. या राज्यात सामान्यांची चिंता करणारी सत्ता प्रस्थापित झाली आहे. सत्तेबाहेर असतानाही येथील जनतेने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर प्रेम केले. त्यांचे शहराच्या विकासाचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना साथ देऊन त्यांच्या कारकि‍र्दीवर प्रेम व्यक्त करा, असे आवाहन त्यांनी केले.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “या पोटनिवडणुकीत अश्विनी लक्ष्मण जगताप निश्चितपणे विजयी होणार आहेत. एखाद्याच्या घरात निधन झाल्यानंतर सांत्वन करायला जाण्याची आपली संस्कृती आहे. पण काही नेते लक्ष्मण जगताप यांच्या निधनाच्या दुःखामध्ये मीठ चोळण्याचे काम करत आहेत. स्वतःला मोठे नेते म्हणवणाऱ्यांनी माणुसकीचा धर्म सोडला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना बिनविरोध निवडून द्यायला हवे होते. पण त्यांच्या डोक्यात केवळ राजकारण आहे. त्यामुळे ही जनता विरोधकांना थारा देणार नाही. अनधिकृत बांधकामांबाबत केलेल्या आंदोलनाच्या आजही आमच्यावर केसेस आहेत. हा प्रश्न सोडवल्याचे कोणी कितीही वल्गना करत असले तरी भाजप-शिवसेनेनेच हा प्रश्न मार्गी लावलाय हेच सत्य आहे. पोटनिवडणुकीत विकासात्मक काम केलेल्या दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या कामावरच मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार महेश लांडगे म्हणाले, “दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या घरी शोक व्यक्त करण्यासाठी आलेल्या नेत्यांनी त्यांच्या कामाचा आणि त्यांनी केलेल्या विकासाचा गौरव केला होता. पण नंतर या नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली याचे दुःख असल्याचे त्यांनी सांगितले.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *