स्मार्टसिटीच्या केबल नेटवर्क ठेक्यावरून राष्ट्रवादी -भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप
दि. २७/१२/२०२२
पिंपरी
पिंपरी : स्मार्टसिटीचे भूमिगत केबल नेटवर्क दुबई, पाकिस्तानातील गुन्हेगारांशी संबंधीत कंपनीकडे सोपविण्याच्या मुद्द्यांवरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जुंपली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यासह शहारातील प्रमुख नेत्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन हे केबल नेटवर्क दुबई, पाकिस्तानातील गुन्हेगारांशी संबंधित कंपनीकडे सोपविण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांना बॅकफूटवर जावे लागले होते. त्यानंतर काल सोमवारी रात्री पालिकेतील माजी सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके यांनी ‘केबल नेटवर्क’ च्या कामात राष्ट्रवादीची भूमिका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा! अशा मथळ्याचे प्रसिद्धीपत्रक काढून राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले. त्याची प्रतिक्रिया आज राष्ट्रवादीच्या गोटातून उमटली. माजी विरोधीपक्ष नेता नाना काटे यांनी आज मंगळवारी प्रसिद्धीपत्रक काढून ढाके यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे.
काटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ‘नामदेव ढाके अज्ञानी, त्यांनाही तोंड लपवायची वेळ येईल’ अशा शब्दात डहाके यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. काटे आपल्या पत्रकात म्हणतात; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर टीका करणाऱ्या नामदेव ढाके यांचे पूरते अज्ञान दिसले. शहरासाठी काय धोका संभवतो ते सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसने प्रशासनाला सांगितले. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीशी संबंधीत कंपनीचे संबंध असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले होते. त्यासाठी मोठ्या आंदोलनाची तयारी तसेच जनजागृती मोहीमही सुरू केली होती. इतकेच नाही तर ही निविदा रद्द करण्याची आग्रही मागणी प्रथम राष्ट्रवादीने केली. उलटपक्षी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे कार्याध्यक्ष शेखर सिंह यांच्याकडे विषय मंजुरीसाठी तगादा लावला होता. आता भाजपची अवस्था `चोर तर चोर वर शिरजोर`, अशी आहे.
श्री. नामदेव ढाके यांचा बोलविता धनी कोणी वेगळाच आहे. ढाके हे निव्वळ बोलके बाहुले आहे. आज त्यांचा वापर केला जातोय. उद्याच्याला त्यांची स्थिती `घर का ना घाटका` अशी होणार आहे. राष्ट्रवादीवर आरोप करणाऱ्या श्री. ढाके यांनी अगोदर या विषयाचा थोडासा गृहपाठ केला असता तर बरे झाले असते. ढाके यांचा अज्ञानीपणा उघड झाला आहे. कारण ढाके यांनी त्यांच्या निवेदनात, २५ जून २०२१ रोजी स्मार्ट सिटीच्या १४ संचालक मंडळाच्या बैठकीत या विषयाला मंजुरी देण्यात आली. तसेच, सीईओंच्या उपस्थितीत दि. १७ मे २०२१ रोजी केबल नेटवर्कच्या कामाकरिता खर्चाबाबत चर्चा करण्यात आली, असे म्हटले आहे. मुळात महापालिकेत सत्ता भाजपचीच होती आणि स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळातील १४ पैकी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि खुद्द गटनेते म्हणून ढाके हे संचालक होते. त्यावेळी ढाके आणि भाजपचे नेते झोपेत होते का ? विषयाबाबत अज्ञान होते का ? की भ्रष्टाचारामुळे डोळ्यावरझापड ओढले होते ?
श्री. नामदेव ढाके म्हणतात, ३० जून २०२२ रोजी निर्णय घेण्यात आला. निविदाबाबत अटी-शर्ती ठरविल्या त्याला दि. ५ जुलै २०२२ रोजी मान्यता दिली आहे. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली आहे. अहो अज्ञानी ढाके महोदय, भाजपच्या खोके राजकारणामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी २९ जूनला स्वतःहून राजीनामा दिला आणि ३० जूनला एकनाथ शिंदे यांच्या ईडी सरकारचा शपथविधी झाला. बरे, या विषयाला ५ जुलैला मान्यता दिली असे ढाके म्हणतात, पण त्याकाळात ही मान्यता देणारेसुध्दा शिंदे-फडणवीस यांचेच सरकार होते. महाआघाडी सरकराच्या काळातील नाही तर, शिंदे – फडणवीस यांच्या काळातील हे प्रकरण आहे.
अहो ढाके महोदय, या विषयाला पहिला विरोध राष्ट्रवादी काँग्रेसने केला. २२ डिसेंबर २०२२ रोजी त्याबाबतचे निवेदन आयुक्तांना दिले. त्यानंतर आता कुठे भाजपला जाग आली. आताच्या घडीला महापालिकेत प्रशासकसुध्दा भाजप नेत्यांच्या सांगण्यानुसार बसविण्यात आलेत. राज्यातील सरकार तुमचेच आहे आणि महापालिका आयुक्तसुध्दा भाजपचे एकनारेच आहेत. आशा परिस्थितीत उगाच कांगावा करून आम्ही किती साजूक आहोत, हे दाखविण्याचे नाटक करण्यापेक्षा आयुक्तांना सांगून निविदा रद्द करा. महापालिका निवडणुकीत लोक तुमचे गाल लाल करणार असे दिसले म्हणून तुम्हाला उपरती झाली आणि आता तुम्हीच निविदा रद्द करण्याची मागणी करतात. हा ढोंगीपणा फक्त भाजपलाच जमतो. प्रकरण महागात पडणार म्हणून तुमची तंतरली. तुमचा बुरखा फाटला आहे. भ्रष्टाचाराच्या नादात तुम्ही देशविघातक शक्तींशी हातमिळवणी करायला गेलात आणि उघडे पडलात, अशी रोखठोक टीका नाना काटे यांनी केली आहे.
यापूर्वी भामा आसखेड जॅकवेल प्रकरणात भाजपच्या नेत्याचा ३० कोटींचा झोल असल्याचे राष्ट्रवादीने उघड केले आणि भ्रष्टाचाराचा भंडाफोड केला होता. त्यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी असा कुठलाही भ्रष्टाचार झाला असेल तर मी राजकीय सन्यास घेईन अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा केली होती. त्याच दिवशी खुद्द भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी, याच प्रकरणात २० ते २५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप करून एकनाथ पवार यांना तोंडघशी पाडले. तेव्हापासून एकनाथ पवार हे तोंड लपवत आहेत. आता नामदेव ढाके यांच्यावरही तीच वेळ येणार आहे, असे नाना काटे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.