३२ वर्षांच्या तरुणाला हे सरकार किती घाबरलंय हे महाराष्ट्र बघणार आहे – जितेंद्र आव्हाड
२४ डिसेंबर २०२२
गेल्या दोन दिवसांत दिशा सालियान मृत्यू प्रकरणामुळे अधिवेशनात दोन्ही बाजूंनी तुफान आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी रिया चक्रवर्तीच्या फोनवर AU नावाच्या नंबरवरून ४४ फोनकॉल्स आल्याचा आरोप राहुल शेवाळेंनी अधिवेशनात केला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी सरकार आदित्य ठाकरेंना घाबरत असल्याचा खोचक टोला लगावला आहे.
माझ्या बाजूला उभे असलेले आमचे बंधुतुल्य सहकारी आदित्य ठाकरे यांच्यावर एसआयटी बसवायची. दर आठ दिवसांनी त्यांना बोलवायचं. मग तुम्ही जाणार, टीव्हीवर दिसणार. या ३२ वर्षांच्या तरुणाला हे सरकार किती घाबरलंय हे महाराष्ट्र बघणार आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
महाराष्ट्राला याची कल्पना आहे की याच्यात कोणतंही सत्य नाही. सत्य असतं, तर एवढे दिवस याला सोडलाच नसता. पण उगंच बाऊ करायचा आणि सगळे भ्रष्टाचार याच्या AU च्या मागे लपवायचे. हे AU फक्त एनआयटीचा भ्रष्टाचार मागे टाकण्यासाठी काढलं गेलं आहे. यांनाही माहिती आहे की यात काही सत्य नाही. आदित्य ठाकरेंचं कालपासूनचं वागणं बघता ते अजिबात असल्या गोष्टींना घाबरत नाहीत. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसचा एकही कार्यकर्ता अटकेला घाबरत नाही. ज्यांना अटक करायचीये, करा. पण तुमच्या भ्रष्टाचारावर आम्ही पांघरूण घालू देणार नाही असं आव्हाड म्हणाले.
आदित्य ठाकरेला हे सरकार का घाबरते
@AUThackeray @OfficeofUT pic.twitter.com/DYzJA5IRcX— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 23, 2022