कालपर्यंत ते चांगले आज ते दलाल, देवेंद्र फडणवीसांचा राऊतांना टोला
१७ डिसेंबर २०२२
नाशिकमधील शिवसेना(ठाकरे गट) नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी जे तिकडे गेले ते सगळे दलाल आहेत आणि ते आपल्या कामासाठी गेलेले आहेत, असं म्हटलं आहे. यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीस म्हणाले,त्यांच्या पक्षावर लोकांचा विश्वास उरलेला नाही, म्हणून लोकं जर दुसऱ्या पक्षात गेले तर ते दलाल?, कालपर्यंत ते चांगले आज ते दलाल. मला असं वाटतं की ही जी भाषा ते वापरतात, आता लोकांना या भाषेचा रागदेखील येतो आणि लोक त्यांना गांभीर्याने घेतही नाहीत.
गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत तुमची जी बैठक पार पडली, यावर शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असं म्हणाले आहेत की, यामध्ये काही नवीन घडलं नाही. असे विधान त्यांनी केले होते. याबाबत माध्यमांनी फडणवीसांना प्रश्न केला त्यावर फडणवीस म्हणाले की, ते होते ना अडीच वर्षे त्यांनी काय नवीन घडवलं? एका बैठकीत नवीन घडेल असं कधीच होत नाही. एक संवादाची सुरुवात झाली आहे. तणाव दूर करण्यासाठी ही बैठक झालेली आहे. त्यांना खरं म्हणजे या गोष्टीची चिंता आहे, की या विषयाला धरून ते जे काही राजकारण करू इच्छित होते, ते राजकारण आता त्यांना करता येणार नाही, ही त्यांची खंत आहे.” असे फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.