शिंदे गट व भाजपच्या डोक्यात गांडूळाचा मेंदू; राऊतांची शिंदे-फडणवीसांवर टीका
१७ डिसेंबर २०२२
महापुरुषांचा अपमान, मंत्र्यांची बेताल विधानं महाविकास आघाडीने महामोर्चाची हाक दिली आहे. आज सकाळी रिचर्डसन अँड कृडास, नागपाडा, मुंबई येथून या मोर्चाला सुरवात होईल. याआधी शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल चढविला आहे.
संजय राऊत म्हणाले की, घणाघात होणारच. पण, घणाघात होणार या कल्पनेनेच सरकारचे पाय लटपटू लागले आहेत. मोर्चाला परवानगी देण्यासाठी टाळाटाळ, अटी-शर्थी. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचा सातत्याने अवनाम महाराष्ट्रात होत आहे. याविरोधात महाराष्ट्र स्वाभिमानाचा हा मोर्चा आहे. तुम्ही त्यांना अटी घालता. हे नाही करायचे, इथे स्पीकर लावयचा नाही. भाषणे अशीच करा. मग भाषणे सरकारने लिहुनच द्या. मुख्यमंत्र्यांना भाषण लिहुन दिले जाते आणि ते बोलतात. आम्हाला विरोधी पक्षीय लोकांना भाषण तुम्ही लिहून देणार का, अशी टीका त्यांनी केली आहे. पण, आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही. सरकारमध्ये कोणी महाराष्ट्रप्रेमी उरले असतील. त्यांनी सामील व्हा. पण, त्यांचे महाराष्ट्र प्रेम खोक्यांखाली दबले गेले आहे, असाही निशाणा राऊतांनी शिंदेंवर साधला आहे.
मुख्यमंत्री त्यांचे शहर स्वतःचं बंद करत आहेत. हा मी एक वेगळाच प्रकार बघतोय की मुख्यमंत्री त्यांचे शहर बंद करण्याचे आदेश देतात. आणि गृहमंत्री पाहत राहत आहेत. त्यांच्या डोक्यामध्ये गांडुळांचा मेंदू आहे. तो नुसता वळवळत असतो. तुम्ही राज्यकर्ते आहात. विचारांचे उत्तर विचारांनी द्या. कुठला तरी गट पकडायचा वारकरी संप्रदायातला आणि आमच्या विरुध्द सोडून द्यायचा. जरी तुमचे राज्य घटनाबाह्य व बेकायदेशीर अशले तरी तुम्ही सत्तेवर आहेत. सत्तेवर असल्याचे भान ठेवा व प्रगल्भता दाखवा. राज्य फार महत्वाचे आणि मोठे आहेत. मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्र प्रेमाचे अंश शिल्लक असेल तर त्यांनी ठाणे बंद मागे घ्यावा आणि आमच्या मोर्चात सामील व्हा, असे आवाहन संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना केले आहे.