विरोधी पक्षांना काय बोलायचं, ते बोलू द्या; सीमाप्रश्नावरून एकनाथ शिंदेंचं विरोधकांना प्रत्युत्तर

१६ डिसेंबर २०२२


महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना बैठकीसाठी बोलावलं होतं. यावेळी बैठकीनंतर सीमाप्रश्नावर चर्चा करण्यासाठी दोन्ही राज्यांमधील प्रत्येकी तीन मंत्र्यांची समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. यासंदर्भात महाविकास आघाडीकडून शिंदे सरकारवर आक्रमक भूमिका घेतली जात नसल्याची टीका करण्यात आली. त्यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्र्यांनी कर्नाटक-महाराष्ट्राच्या वादात हस्तक्षेप केला आहे. इतकी वर्ष कुणाकुणाचं सरकार केंद्रात आणि राज्यात होतं. पण तो निर्णय त्यांना घेता आला नाही. त्यात हस्तक्षेप करावा असं कुणाला वाटलं नाही. दोन्ही राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित व्हायला हवी, महाराष्ट्रातील नागरिकांना याचा त्रास होता कामा नये, अशी भूमिका आम्ही मांडली आहे. यावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी तशा सूचना कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकारला दिल्या आहेत. विरोधी पक्षांनाही त्यांनी आवाहन केलं आहे. या प्रश्नाकडे सामाजिक बांधिलकी म्हणून पाहायला हवं .राजकीय मुद्दा म्हणून याकडे पाहिलं जाऊ नये. आता विरोधी पक्षांना काय बोलायचं, ते बोलू द्या, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *