महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबत गृहमंत्री अमित शहा मार्ग काढतील – सुप्रिया सुळे
०९ डिसेंबर २०२२
मागील काही दिवसांपासून सुरू असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता लवकरच मिटण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या खासदारांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. यानंतर शहांनी सकारात्मक भूमिक घेतल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.


सुप्रिया सुळे म्हणाल्या, कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद, छत्रपतींच्याबद्दल सरकारमधील लोकांची बेतालं विधानं, सत्तेतील वाचाळवीर तसेच राज्यपाल जे काही बोललेत त्याबद्दल आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून शहांना माहिती दिली आहे. मला विश्वास आहे की गृहमंत्री अमित शहा काहीतरी मार्ग काढतील. गुजरातचा शपथविधी झाल्यानंतर काहीतरी मार्ग काढला जाईल असं त्यांनी सांगितलंय. त्यामुळं माझा विश्वास आहे की यामध्ये केंद्राचा लवकरच हस्तक्षेप होईल. आम्हाला विश्वास आहे की, गृहमंत्री पक्षपातीपणा करणार नाहीत.
संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होऊन तीन दिवस झाले पण सत्तेत असलेल्या कोणत्याही खासदारानं महाराष्ट्र, छत्रपती, समीवाद या विषयावर सभागृहात बोललेलं मला दिसलं नाही. त्यामुळं अतिशय असंवेदनशीलपणे हे ईडीचं सरकार वागतंय. सीमावादावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली पाहिजे, अशी माझी सुरुवातीपासूनची मागणी आहे. पण आत्ताचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विरोधीपक्षांना विश्वासात घेऊन कृती करताना दिसत नाही.कुठलाही स्टॅड घेत नाहीत हे दुर्देवी आहे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.