पेंग्विन सेनेचे युवराज; आशिष शेलार यांची आदित्य ठाकरेंवर टीका
१७ नोव्हेंबर २०२२
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात सुरु आहे. त्यात राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यावरून भाजपा आणि शिंदे गट आक्रमक झाला आहे. राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रातच रोखावी, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. तर, यावरून भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर पेंग्विन म्हणत टीका केली आहे.
काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला होता. हाच मुद्दा पकडून आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. “महाराष्ट्रात येऊन राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात. त्यांच्या हातात हात घालून पेंग्विन सेनेचे युवराज चालतात. हे भारत जोडो नाही, भारत तोडो!… यात्रेचा चेहरा राहुल… तुष्टीकरणासाठी घुसखोर आदित्य… अजेंडा तुकडे तुकडे गँगचा!… सगळं ओके असलं तरी, आम्ही जनतेसमोर उघडे पाडणार,” असं आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हंटलं आहे.