भाजपला राज ठाकरेंनी लिहलेलं पत्र हा स्क्रिप्ट चा भाग होता – संजय राऊत
आपला आवाज न्यूज नेटवर्क
१७ ऑक्टोबर २०२२
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक बिनविरोध करण्याबाबत लिहलेल्या पत्रानंतर भाजपाने निवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात ही घोषणा केली. राज ठाकरेंनी सर्वांत पहिल्यांदा भाजपाला पत्र लिहून अंधेरी-पूर्व पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही बिनविरोध करण्यासाठी आवाहन केलं होते.
यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि राज ठाकरेंवर टीका केली आहे. मुंबई सत्र न्यायालयात संजय राऊतांना हजर करण्यात आले होते. तेव्हा प्रसारमाध्यमाणशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, भाजपाला राज ठाकरेंनी लिहलेलं पत्र हा स्क्रिप्टचा भाग होता. शिवसेना अंधेरीची पोटनिवडणूक ४५ हजारांच्या मताधिक्याने जिंकणार होती. भाजपाने या मतदारसंघात सर्वे केला होता. पराभवाची चाहूल लागल्यामुळेच भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घेतला असे राऊत यांनी म्हटलं आहे.