आंद्राचे 50 एमएलडी पाणी नोव्हेंबरमध्ये मिळणार

रोहित खर्गे
विभागीय संपादक  
१७ ऑक्टोबर २०२२

पिंपरी


आंद्रा धरणातून पाणी उचलण्यासाठी निघोजे येथील इंद्रायणी नदीवरील अशुद्ध जलउपसा केंद्राचे (जॅकेवल) काम अंतिम टप्प्यात आहे.  येत्या 20 दिवसात निघोजेतून पहिल्या टप्प्यात 50 एमएलडी पाणी उचलले जाईल. त्यातून समाविष्ट गावाला पाणीपुरवठा केला जाईल. या भागाचे अतिरिक्तचे पाणी चिंचवडमधील वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेगुरव, रावेत या गृहनिर्माण सोसायट्या असलेल्या भागाला दिले जाईल. त्यामुळे शहरातील पाणी समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.

संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणार

खासदार बारणे, भाजपचे शहराध्यक्ष,  आमदार महेश  लांडगे,  भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी आज (सोमवारी) संयुक्तपणे चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाची पाहणी केली. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी प्रकल्पाबाबतची सविस्तर माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, प्रदीप जांभळे, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता देवांन्ना गट्टुवार, गोंडवाना इंजिनिअर्स लिमिटेड ठेकेदाराचे प्रतिनिधी उपस्थित होते.


खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, आंद्रा आणि भामा आसखेड प्रकल्पातून उचलण्यात येणा-या 267 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्यावरील प्रक्रियेसाठी महापालिकेच्या वतीने चिखलीत आठ हेक्टर परिसरात उभारण्यात येत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्णत्वाकडे आहे. दोन लाईन जोडायच्या राहिल्या आहेत. त्याचे काम आठ दिवसात होईल. येत्या 15 दिवसात पाणी सोडण्याची चाचणी होईल. आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी उचलण्यासाठी निघोजे येथील इंद्रायणी नदीवरील अशुद्ध जलउपसा केंद्राचे (जॅकेवल) काम पूर्ण झाले आहे.

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे यांच्याकडून कामाची पाहणी

येत्या 20 दिवसात म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या टप्प्यात निघोजेतून 50 एमएलडी पाणी उचलले जाईल. पुढील तीन महिन्यात आणखी 50 एमएलडी पाणी उचलण्यात येईल.  त्यातून समाविष्ट भागातील  तळवडे, चिखली, मोशी, निघोजे आणि तळवडे येथील इंद्रायणी डुडुळगाव, चहोली, दिघी या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जाईल.त्यामुळे या भागाचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. या भागाला पाणी मिळाल्याने शहराच्या उर्वरित भागाला अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल.चिंचवडमधील वाकड,पिंपळेनिलख, पिंपळेगुरव, रावेत या गृहनिर्माण सोसायट्या असलेल्या भागाला अतिरिक्त पाणी मिळेल. त्यामुळे शहरातील पाणी समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असा विश्वासही खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

 भामा आसखेड धरणाजवळ 200 एमएलडीचे ‘जॅकवेल’ बांधणार!

भामा आसखेड धरणातील 167 एमएलडी पाणी महापालिकेसाठी आरक्षित आहे. ते पाणी उचलण्यासाठी महापालिक  धरणाजवळ वाकी तर्फे वाडा येथील 1.20 हेक्टर जागेत 200  दशलक्षलिटर (एमएलडी) प्रतिदिनी क्षमतेच्या अशुद्ध जलउपसा केंद्रासाठी जॅकवेल, अ‍ॅप्रोच ब्रीज, सबस्टेशन बांधणार आहे. तेथून नवलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर टँक पर्यंत पाणी आणले जाईल आणि तेथून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाणार असल्याचेही खासदार बारणे यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *