शिवसेनेचा अस्त जवळ आला आहे; नारायण राणे यांची टीका
आपला आवाज न्यूज नेटवर्क
०३ ऑक्टोबर २०२२
वरळीतील शेकडो शिवसैनिकांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवास्थानी शिंदे गटात प्रवेश केला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचा शिंदे गटात झालेला प्रवेश हा शिवसेना नेते आदित्य ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. वरळीत शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना धक्का दिल्यानंतर नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
शिंदे गट बरेचसे धक्के शिवसेनेला देत आहे, आता मला काळजी एवढीच आहे की या धक्क्यांमधून उद्धव ठाकरेंची शिवसेना किती स्वत:ला सांभाळू शकेल हा प्रश्न आहे. पण शिवसेनेचा अस्त जवळ आला आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
सचिन वाझे यांच्याकडून मातोश्रीवर दर महिन्याला १०० खोके जात होते असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांनी केला आहे. यावर नारायण राणे म्हणाले की, माझ्याकडे काही पुरावे नाहीत, मी काय त्याल दुजोरा देणार नाही. तुम्हाला दुजोरा दिला आणि परत कोर्ट-कचऱ्या हे सर्व नको. ते साक्षीदार असतील म्हणून त्यांना माहीत असेल.