भटक्या श्वाननाचा बंदोबस्त महानगरपालिकेने करावा; माजी विरोधी पक्षनेते मच्छिन्द्र तापकीर यांची मागणी
आपला आवाज न्यूज नेटवर्क
२९ सप्टेंबर २०२२
काळेवाडी
रहाटणी या दाट लोकवस्तीत मोठ्या प्रमाणात भटक्या श्वानांचा सुळसुळाट झाला आहे. झुंडीझुंडीने फिरणाऱ्या या श्वानांपासून नागरिक आणि लहान मुलांना भीती निर्माण झाली आहे. मोकाट श्वानांनी आतापर्यंत तीन ते चार जणांना चावादेखील घेतल्याची माहिती आहे. या मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रार केल्या. मात्र, तरीही महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी केली आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. त्यात मच्छिंद्र तापकीर यांनी म्हटले आहे की, काळेवाडी-रहाटणीच्या गल्लोगल्लीत मोकाट श्वानांचा वावर वाढला आहे. या श्वानांची दहशत स्थानिक नागरिकांमध्ये पसरली असून, सामान्य नागरिकांचे रस्त्यावर फिरणे अडचणीचे झाले आहे. १० ते १२ बेवारस श्वानांचे टोळके प्रत्येक चौकात ठाण मांडून असतात. यामुळे परिसरातील नागरिकांना या श्वानांपासून मोठा धोका निर्माण झाला आहे. काही नागरिक आपल्या घरातील शिळे अन्न घराबाहेर टाकत असल्यामुळे हे श्वान मोठ्या प्रमाणात तुटून पडतात. त्यामुळे त्यांची दहशत वाढली असून, जवळून जाणाऱ्या येणाऱ्या पादचाऱ्यांवर जोराने भुंकत असतात.