मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे बुझवून रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी; अजित पवारांची पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आपला आवाज न्यूज नेटवर्क
१९ सप्टेंबर २०२२
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. हे अंतर कापण्यासाठी दुपटीहून अधिकचा कालावधी लागत आहे. ह्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुझवून रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी; महामार्ग वाहतूक कोंडीतून मुक्त करावा, अशी मागणी अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून केली आहे.
पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून या अपघातामध्ये अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मणक्यांच्या आजारांचं प्रमाण वाढलं आहे. वाहतूक कोंडीमुळे शहरातील प्रदुषणामध्ये भर पडत आहे. मुंबई-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणारे नागरिक आपला जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत,” असं या पत्रात म्हटलं आहे.
या परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करणे, पुलांचे अपूर्ण काम युद्धपाथळीवर पूर्ण करणे, अवजड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढणे यासाठी शहरातील लोकप्रतिनिधी, वाहतूकदार संघटना, प्रवासी संघटना, स्थानिक नागरिक आदींना विश्वासात घेऊन वाहतुकीचे सुयोग्य आणि प्रभावी नियोजन करावे. अनुषंगित उपाययोजना तात्काळ करण्याबाबत संबंधितांना सूचना द्याव्यात. अशहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करुन या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांना दिलासा देण्याचे काम करावे, ही विनंती.