आणे पठाराला पाणी देण्यासाठी लवकरच बैठक घेऊन सकारात्मक चर्चा करू : जलसंपदामंत्री जयंत पाटील
रामदास सांगळे
विभागीय संपादक
जुन्नर
२८ फेब्रुवारी २०२२
बेल्हे : येडगाव, वडज, पिंपळगाव धरणातील पाणी उपससिंचन योजनेच्या माध्यमातून किंवा कोणत्या पद्धतीने अणे पठाराला कसे देता येईल यावर लवकर बैठक घेऊन सकारात्मक चर्चा करून निर्णय घेऊ अशी माहिती राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जुन्नर येथील कार्यक्रमात बोलताना दिली.
या बाबत सविस्तर माहिती अशी की जुन्नर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिसंवाद यात्रेदरम्यान आणे पठारावरील असणाऱ्या अवर्षण प्रवण क्षेत्रातील गावांना कुकडी योजनेतून उपसा सिंचनाने पाणी कशाप्रकारे देता येईल याबाबतची बैठक जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या उपस्थित जलसंपदाच्या अधिकार्यांसमवेत आयोजित केली जाईल व आणे पठाराला उपसा सिंचनाने पाणी कसे देता येईल यावर चर्चाकरू तसेच कुकडी प्रकल्पातील हवं तेवढं पाणी जुन्नर साठी ठेवून उरलेलं पाणी नियोजनासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आग्रही भूमिका घेतली.
यावेळी माननीय मंत्र्यांना शेतकरी संघटना जुन्नर तालुका भारतीय किसान संघ त्याचप्रमाणे पठार विकास संस्था आणे यांच्या वतीने संयुक्त निवेदन देण्यात आले.पठार भागाला जर पाणी मिळाले तर सुमारे १० हजार एकर क्षेत्र बागायती होईल. याचा फायदा पठारावरील शेतकऱ्यांना होईल. आणे पठारावरील आणे – पेमदरा – शिंदेवाडी – नळवणे – काटाळवेढा – पळसपूर – म्हसोबाझाप या ग्रामपंचायतीचे ग्रामसभेचे ठरावाच्या प्रती दिल्या. तसेच पठारावरील पारनेर व जुन्नर तालुक्यातील गावच्या सरपंचांनी आमच्या पठारावरील गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी विनंती जलसंपदा मंत्र्यांना विनंती केली.याप्रसंगी शेतकरी संघटनेचे नेते अंबादास हांडे, भारतीय किसान संघाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब दाते, शिंदेवाडी गावचे सरपंच एम.डी.पाटील शिंदे,व नळवणे गावच्या सरपंच अर्चना उबाळे, पठार विकास संस्थेचे पदाधिकारी,दत्तू नलावडे,पाटील गाडेकर,सुरेखा काळे,जयश्री गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.