पाणी नव्हे विष!; काळेवाडीकरांच्या नळालाही अळ्या मिश्रित पाणी

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२१ जानेवारी २०२२

काळेवाडी


काळेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असून नळामधून पाण्याबरोबर अळया आणि किडे येत असल्याने महापालिका नागरिकांना पाणी देतंय की विष? असा संतप्त सवाल मनसे महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्षा अनिता पांचाळ यांनी केला आहे. यासंदर्भात काळेवाडीतील नागरिकांनी तक्रार करताच अनिता पांचाळ यांनी तातडीने महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना भेटून सदर समस्या त्यांच्यासमोर मांडली. तसेच तात्काळ शुद्ध पाणीपुरवठा करण्यासंदर्भातील निवेदन अधिकाऱ्यांना दिले.

शुद्ध पाणी न मिळाल्यास अधिकाऱ्यांना हेच पाणी पाजण्याचा मनसे नेत्या अनिता पांचाळ यांचा इशारा

सदर निवेदनात अनिता पांचाळ यांनी म्हटले आहे की, मागील काही दिवसांपासून काळेवाडी प्रभाग क्रमांक २२ मध्ये अतिशय अशुद्ध असा पाणीपुरवठा महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. नळाच्या पाण्यातून अळ्या, किडे, कचरा आणि दुर्घंधियुक्त पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून लहान मुले, जेष्ठ नागरिक यांच्यासह सर्वांनाच अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे.

पाणीपुरवठा विभाग ज्याप्रकारे नागरिकांकडून नळाच्या पाण्याच्या बिलाची वसुली करते त्याप्रकारे नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा का केला जात नाही. लवकरात लवकर नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध न झाल्यास पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेच पाणी पाजण्यात येईल असा मनसे स्टाईल इशारा अनिता पांचाळ यांनी यावेळी दिला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *