गावातील शाळा सुरू करा ; बिरसा ब्रिगेडची ग्रामपंचायतीकडे मागणी…
जांभोरी : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र शाळा बंद आहेत. परंतु ज्या गावात कोरोना प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून शाळा सुरू कराव्यात याबाबतचे निवेदन बिरसा ब्रिगेडने जांभोरी येथील ग्रामसेवक यांना देण्यात आल्याचे बिरसा ब्रिगेड जांभोरीचे अध्यक्ष सुनील गिरंगे यांनी सांगितले.
जांभोरी गावामध्ये अनियमित वीजपुरवठा व मोबाईल नेटवर्कच्या कारणास्तव विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळत नाही. तसेच काही पालकांकडे मोबाईल उपलब्ध नसल्याने त्यांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही. गेल्या वर्षांपासून हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टन्स या नियमांचे पालन करून शाळा सुरू कराव्यात अशी मागणी निवेदनात केली असल्याचे गिरंगे यांनी सांगितले. यावेळी बिरसा ब्रिगेड जांभोरीचे उपाध्यक्ष मारुती केंगले, जांभोरी ग्रामविकास फाऊंडेशनचे अध्यक्ष पुनाजी पारधी, किसन शेळके, दुंदा भोपळे, गणपत काठे, दिगंबर केंगले आदी उपस्थित होते.