बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करावी – खासदार डाॅ.अमोल कोल्हे
नवी दिल्ली (प्ररतिनिधी) –
महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असणारी बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन शिरूर लोकसभा मतदार संघांचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांना दिले आहे. यावेळी सातारा लोकसभा मतदार संघांचे खासदार श्रीनिवास पाटील हेही उपस्थित होते.
केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांना दिलेल्या निवेदनात खा. अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे की, बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या या शर्यती सुरू व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.महाराष्ट्राची सुमारे ४०० वर्षांची परंपरा, बैलगाडा शौकीन व मालक यांच्या भावना, देशी गोवंशाचे रक्षण व ग्रामीण पर्यटनाला चालना या हेतूने बैल या प्राण्याचा संरक्षित प्राण्यांच्या यादीतील समावेश वगळावा. यामुळे बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होतील, असे खा. कोल्हे यांनी निवेदनात म्हटले आहे.