आम्हाला कर्नाटकात जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, विनाकराण यासंदर्भात नवे वाद सुरु करणं चुकीचे – देवेंद्र फडणवीस
०५ डिसेंबर २०२२
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राला डिवचले जात असल्याने महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्न प्रकरण पुन्हा पेटले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सीमाभागांतील गावांवर केलेल्या दाव्यानंतर राजकारण तापलं आहे. कर्नाटकला जशाच तसे उत्तर देण्यासाठी सीमा प्रश्नावर समन्वय साधन्यासाठी महाराष्ट्र सरकारने समितीचे नेते चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई हे दोन्ही मंत्री बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र, अचानक दौरा रद्द झाला. याबाबत बोलताना उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यामुळे याबाबत कर्नाटक किंवा महाराष्ट्र निर्णय घेऊ शकत नाही. सगळा निर्णय सर्वोच्च न्यायलय घेणार आहे. या संदर्भात नव्याने वाद तयार करणं योग्य होणार नाही. महाराष्ट्राने ताकदीने आपली बाजू मांडली आहे त्यामुळे आपल्याला सर्वोच्च न्यायालयातून न्याय मिळेल यावर विश्वास ठेवायला हवा.
आम्हाला कर्नाटकात जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. विनाकराण यासंदर्भात नवे वाद सुरु करणं चुकीचे आहे. मंत्र्यांचा हा दौरा महापरिनिर्वाण साठी होता. मंत्र्यांनी ठरवले तर त्यांना जाण्यापसून कोणी रोखू शकत नाही. पण महापरिनिर्वाण दिनी अशा प्रकारचा वाद तयार करायचा का हा महत्त्वाचा विषय आहे. यासंदर्भातील विचार करुन मुख्यमंत्री निर्णय देतील. आपल्याला भविष्यात त्या ठिकाणी जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. कोणीही घाबरत देखील नाही. त्या दिवशी महापरिनिर्वाण दिन असल्याने काय करावं याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.