मशाल चिन्हावरील समता पार्टीच्या दाव्यावर भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया
आपला आवाज न्यूज नेटवर्क
१२ ऑक्टोबर २०२२
भारतीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नाव, तर ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिलेले आहे. पक्षाला नाव आणि निवडणूक चिन्ह मिळालेले असले तरी, अद्याप ठाकरे गटाच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. ठाकरे गटाला दिलेल्या मशाला या चिन्हावर आता समता पार्टीने दावा केला आहे. समता पार्टीच्या दाव्यावर उद्धव ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
१९९४ सालापासून मशाल हे आमच्या पक्षाचे चिन्ह आहे, असा दावा दिवंगत नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या पक्षाने केला आहे. त्यानंतर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मशाल या निवडणूक चिन्हावर दावा सांगितला जात आहे. याबाबतची प्रत्यक्ष माहिती माझ्याकडे नाही. मात्र हे चिन्ह आम्ही स्व:त घेतलेले नाही. भारतीय निवडणूक आयोगाने हे चिन्ह आम्हाला दिले आहे. त्यामुळे त्यांना काही तक्रार, दावा, मागणी करायची असेल, तर ती भारतीय निवडणूक आयोगाकडे करावी असंही भास्कर जाधव म्हणाले.