खोके, खंजीर, धोका एवढंच त्यांना बोलता येतं; श्रीकांत शिंदेंचा संजय राऊतांवर निशाणा
०५ डिसेंबर २०२२
सकाळी उठल की एक भोंगा सुरू होतो. तेच तेच बोलायच. खोके, खंजीर, धोका एवढंच बोलतात. आधी खोके कोणाकडे जात होते कुठे जात होते. कोण मोजायचे, त्यामुळे त्यांना नुसते खोके खोके आठवतात. पण आता परत कधीच खोके सुरु होणार नाहीत. हे त्यांनी लक्षात ठेवावे, अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
बाळासाहेबांच्या शिवसेनेचा पुण्यात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, मागील अडीच वर्षात असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात केवळ घोषणा झाल्या. पण कोणत्याही प्रकारची काम झाली नाही. आम्ही आमची कामे पक्ष नेतृत्वाकडे घेऊन गेल्यावर आम्हाला वेळ दिला जात नव्हता. या गोष्टी सतत होऊ लागल्याने अखेर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ५० आमदार आणि १३ खासदारांना उठाव करावा लागला. त्यानंतर शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री होऊन जवळपास चार महिन्याचा काळ लोटला. त्या दरम्यान राज्यातील अनेक भागातील आमदार, खासदार सर्व सामान्य नागरिक मुख्यमंत्र्यांना वर्षा निवासस्थानी येऊन भेटत आहे. याच वर्षा निवासस्थानाची दारं आमदार, खासदाराना बंद होती. तेच दार सर्वासाठी खुली झाल्याने सर्वजण आनंदी असून अनेकांची काम होत आहेत.त्याचा आम्हाला आनंद असून येत्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणावर काम केली जाणार असल्याचेही श्रीकांत शिंदे म्हणाले.