पतीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांची पहिली प्रतिक्रिया
आपला आवाज न्यूज नेटवर्क
१४ नोव्हेंबर २०२२
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी ट्वीटरवरुन पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर टायर जाळून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी समर्थकांनी केला. मुंब्रा पोलीस स्थानकाबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठिय्या आंदोलन करत असतानाच आता आव्हाडांच्या पत्नीने या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
ऋता सामंत-आव्हाड यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे, त्यांच्याकडे मोटीव्ह आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीत रीदा रशिद यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्या जामिनावर आहेत. NCP व आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बोलल्या आहेत. अंगावर धडकणाऱ्या व्यक्तिला बाजूला करणे गुन्हा असेल तर बाजारात, ट्रेन मध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील. असा ऋता आव्हाड यांनी म्हटलं आहे.
रीदा रशिद ह्या राजकारणी महत्वाकांक्षा बाळगतात.आणि काल रात्री त्या कुणाला तरी भेटल्या. त्यांच्यावर पण अॅट्रोसिटी चा गुन्हा दाखल झाला आहे. जे काही घडलं ती स्पॉनटेनियस रिअॅक्शन होती. त्याला विनयभंग म्हणतां येत नाही.असंही ऋता आव्हाड यांनी म्हटलं आहे.