राजुरीत हिंदू-मुस्लिम बांधवांचा सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे दर्शन

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
०३ सप्टेंबर २०२२

राजुरी


समता गणेश मंडळ राजुरी (इंदिरानगर) हे मंडळ नोंदणीकृत असून सन १९९२ साली सर्वांनी एकत्र येऊन या मंडळाची स्थापना केली.नावाप्रमाणेच समतेचा संदेश देणाऱ्या या मंडळामध्ये सर्वच जाती, धर्माचे, पंथाचे लोक त्याचप्रमाणे बाराबलुतेदार एकत्रितपणे दरवर्षी श्री गणेशाची मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने पूजा अर्चा करतात.दरवर्षी सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक,नैसर्गिक,राजकीय,उपदेशपर,लोककलेवर आधारित,पारंपरिक,लोकजागृतीपर विषयावर आधारित असे नवनवीन देखावे हे मंडळ साकारण्याचा प्रयत्न करते.यापूर्वीही नेहरू युवा केंद्र पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.विघ्नहर्त्या गणरायाचे मनोभावे पूजन करताना सामाजिक जाणिवांचे भान बाळगणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या आयोजित स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल सपट चहा व दैनिक गावकरी या वृत्तसमूहाने समता गणेश मंडळ राजुरी यांना विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविले होते.

मंडळाची स्थापना झाली तेव्हा १९९२ च्या काळात गणेशाची मूर्ती ही एक पोत्याच्या शेडमध्येच बसविली जात होती.सन २०११ मध्ये पंचायत समितीचे माजी सभापती दीपक औटी ,सरपंच माऊली शेळके,उपसरपंच एम.डी. घंगाळे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत सभापती जयंत रघतवान यांच्या निधीतून मंडळासाठी समाजमंदिर बांधण्यात आले.त्यासाठी भगवान औटी यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. स्थापनेपासून ते आजपर्यंत गरुड,डायनासोर,नारळ गडवा, हनुमान,पर्णकुटी,ससा,मिनी जहाज,बदक,डोंगर,मोर अशा अनेक कलाकृतींना युक्त असे देखावे सादर केलेले आहेत .सन १९९८ मध्ये मंडळ नोंदणीकृत करण्यात आले.माजी सभापती दीपक शेठ औटी यांच्या प्रयत्नातून भजनी साहित्य,सतरंज्या व स्पीकर सेट यांचे वितरण करण्यात आले होते.तसेच या पूर्वी माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल वल्लभ शेळके यांच्या प्रयत्नातून मंडळाला पारंपरिक वाद्य ढोल व ताशांचे वितरण करण्यात आलेले होते.

मागील वर्षी मा.आमदार शरद दादा सोनवणे यांचा दातृत्वातून स्वखर्चाने गणपतीचे शेड उभारण्यासाठी २.५ लक्ष रु.चा निधी मंजूर होऊन काम पूर्ण देखील झालेले आहे.ग्रामपंचायत राजुरी यांचेकडून फरशी देखील बसविण्यात आलेली आहे.दरवर्षी येथील भाविक या गणेशाला इप्सित कार्य पार पडण्यासाठी नवस करतात व हा गणेश नवसाला पावतो.मनात भाव शुद्ध असेल तर गणपती शुभ फळ देतो अशी याची ख्याती आहे. म्हणूनच एका मुस्लिम बांधवाने श्रद्धेपोटी गणपतीची मूर्ती विकत आणून मंडळाकडे सुपूर्त केली.मंडळातील सर्व सदस्यांनी आदरपूर्वक त्याचा स्वीकार करून सामाजिक सलोखा,एकोपा,राष्ट्रीय एकात्मकतेचा संदेश यातून समजापुढे ठेवलेला आहे.ईश्वर-अल्लाह हे वेगळे नसून एकच आहेत हेच यातून दिसून येते.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रांगोळी स्पर्धा,संगीत खुर्ची,दांडिया,चमचा लिंबू इ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहेत. तसेच लवांडे यांचे मनोरंजनपर कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत.मंडळाच्या या यशस्वी वाटचालीत अध्यक्ष सखाराम गाडेकर,उपाध्यक्ष सिताराम जेडगुले,सचिव भगवान औटी,खजिनदार दिनेश बनकर,सुखदेव पवार,ज्ञानेश्वर गाडेकर आणि सर्व तरुण वर्गाचा सक्रिय सहभाग व मोलाचा वाटा आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *