कष्टकरी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटन बळकट करूयात – ॲड.नाथा शिंगाडे
मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१८ ऑगस्ट २०२२
घोडेगाव
आंबेगाव तालुक्यात मागील बारा वर्षापासून किसान सभा,या राष्ट्रीय संघटनेचे काम, सर्वसामान्य जनतेच्या हीतासाठी सुरु आहे. दर तीन वर्षांनी किसानसभेचे अधिवेशन होवून तालुका स्तरावर कामकाज करणेसाठी लोकशाही पद्धतीने नवीन कार्यकारणी नेमून किसान सभेचे कामकाज, सदरील तालुका समितीच्या नेतृत्वाखाली पुढील तीन वर्षे चालते. किसान सभा,आंबेगाव तालुका समितीचे नुकतेच पाचवे त्रैवार्षिक अधिवेशन, तळेघर ता.आंबेगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी किसान सभेचे सदस्य मोठय संख्येने उपस्थित होते. या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून,अखिल भारतीय किसान सभा पुणे जिल्हा समितीचे,अध्यक्ष ॲड नाथा शिंगाडे उपस्थित होते. त्यांनी यावेळी किसान सभेची पार्श्वभूमी सांगताना, वारली आदिवासी उठावाच्या वेळी कॉ.गोदूताई परूळेकर व कॉ.शामराव परूळेकर यांच्या कार्याची माहिती सांगितली.
आंबेगाव तालुक्यात प्रथम किसान सभेचे काम सुरू करणारे व या कामाला सर्व ते सहकार्य करणारे, आदिवासी सेवक,निसर्गवासी शंकर विठू केंगले यांच्या योगदानाबद्दल माहिती यावेळी ऍड.नाथा शिंगाडे यांनी नमूद केली. याबरोबरच वाढती बेरोजगारी,महागाई याविषयी ही तीव्र लढा उभा करण्याचे आवाहन केले.केंद्र व राज्य शासन आदिवासीं,दलित व महिला यांच्या विरोधात जी भूमिका घेत आहे. त्याविरोधात त्त्यांनी लढा उभा करण्याचे आवाहन करून,पुढील काळात संघटना कशी बळकट होईल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थिताना केले. यावेळी किसान सभेचे तालुका सचिव अशोक पेकारी यांनी मागील तीन वर्षाच्या कामकाजाचा अहवाल मांडला.उपस्थित प्रतिनिधी यांनी या अहवालावर चर्चा करून हा अहवाल एकमताने संमत केला. यावेळी किसान सभेचे तालुका अध्यक्ष कृष्णा वडेकर,यांनी आपल्या भाषणात किसान सभेच्या आंदोलनामुळे गावोगावी रोजगार हमीचे व कामे सुरू झाली.तसेच विधवा,निराधारांना पेन्शन मिळाली. गावोगावी किसान सभेच्या गावसमित्या स्थापन करून किसान सभेचे काम कसे वाढेल याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष दिले पाहिजे असे त्यांनी यावेळी नमूद केले. या अधिवेशनाला शुभेच्छा एस.एफ.आय.चे पुणे जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी यांनी उपस्थित राहून दिल्या.
यावेळी अखिल भारतीय किसान सभेची,आंबेगाव तालुका समितीची निवड करण्यात आली. या नवनिर्वाचित आंबेगाव तालुका समितीच्या अध्यक्षपदी सौ.नंदाताई मोरमारे व सचिव पदी रामदास लोहकरे यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच नवनिर्वाचित तालुका पदाधिकारी म्हणून,बाळू काठे, कमलताई बांबळे, पुंडलिक असवले,मच्छिंद्र वाघमारे, दत्ता गिरंगे,सुभाष भोकटे,लक्ष्मण मावळे यांची निवड करण्यात आली तर तालुका समिती सदस्य म्हणून,२३ जणांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अशोक पेकारी यांनी केले तर समारोप नवनिर्वाचित अध्यक्ष सौ.नंदाताई मोरमारे यांनी केले. या अधिवेशनाचे स्थानिक संयोजन किसान सभेच्या आंबेगाव तालुका समितीने केले होते.