खोक्यांचं राजकारण करायचं असेल तर लोकशाही संपली असं जाहीर करा; उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका
१० डिसेंबर २०२२
शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे हस्ते जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज(शनिवार) झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर खोक्यावरून निशाणा साधला.
लोकशाही म्हणजे काय तर लोकांनी निवडून दिलेल्या मताची किंमत खोक्यामध्ये होत नाही. आता आपल्याकडे गुप्त मतदान आहे. मात्र नागरिकांनी दिलेले मत त्यांना तरी माहित आहे का? कुणाकडे जाणार आहे आणि कुठून-कुठ्न जाणार आहे. ट्रॅव्हल एजन्सी सारखं सुरत, गुवाहाटी आणि दिल्ली असे कधी इकडे कधी तिकडे असे मतदान मतदारांपासून गुप्त होऊ लागले आहेत. असे कसे चालणार. अशी लोकशाही आपण मानणार नाही. त्यामुळे लोकशाहीचा अर्थ असा लावणार असेल तर देशातील लोकशाही संपली असे एकदा जाहीर करून टाका. तुम्ही कोणालाही मतदान केले तर त्याला आम्ही खोक्यात बसून आमच्याकडे घेऊन टाकू अशी परिस्थिती असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.