मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आगामी निवडणुका स्वबळावर लढणार…आघाडीची व युतीची चिंता न करता कामाला लागा – शिवसेना जिल्हाप्रमुख शरद सोनवणे
नारायणगाव :- किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार
येणाऱ्या निवडणुका आपल्याला स्वबळावर लढवायच्या आहेत. त्यामुळे आघाडीची व युतीची चिंता न करता कामाला लागा गावोगावी पक्षाची बांधणी करा असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख, माजी आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेना संपर्क अभियानात उपस्थित शिवसैनिकांना केले.
गुरुवार दि १५ रोजी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नारायणगाव बाजारपेठेतून फेरी काढत शिवसेना संपर्क अभियानाची सुरुवात केली. यानंतर जयहिंद मंगल कार्यालयात सभा घेण्यात आली.
याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख व माजी आमदार शरद सोनवणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, जिल्हा समन्वयक संभाजी तांबे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, उपतालुकाप्रमुख मंगेश काकडे, गणेश कवडे, बाळासाहेब पाटे, संतोष वाजगे, सह्याद्री भिसे, नारायणगावचे सरपंच योगेश पाटे,अनिल खैरे,राजेश बाप्ते,गणेश पाटे,अभय वाव्हळ, विकास तोडकरी व शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी शिवसेना जुन्नर तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील अनेक दिवसात कोविडमुळे शिवसेनापदाधिकारी कार्यकर्ते यांचा संपर्क झाला नसल्याने गावोगावी जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख,शाखा प्रमुख यांनी शिवसैनिकांची भेट घेऊन गावोगावी कोरोनाचा आढावा घेणे, लसीकरण झाले आहे की नाही हे पाहणे त्याचप्रमाणे कोरोना काळात ज्या कुटुंबातील पालक गमावले आहेत अशांची यादी करून त्यांच्याकडून शासनाच्या मदतीचे फॉर्म भरून घेतानाच पक्ष बांधणीसाठी हे अभियान राबवत असल्याची माहिती दिली.
माजी आमदार शरद सोनवणे म्हणाले की, कोरोना काळात जुन्नर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे रुग्णांना बेड ,ऑक्सिजन ,इंजेक्शन मिळवून देण्याचे काम केले आहे. शिवसेना संपर्क अभिनयाच्या माध्यमातून कोरोना काळात पालक गमावलेल्या गरजू लोकांना मदत होणार आहे. त्याच प्रमाणे पक्ष बळकटीचे काम होणार असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पुढील येणाऱ्या दिवसातील पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती या निवडणुका शिवसेना पक्ष स्वबळावर लढणार आहे जुन्नर तालुक्यातील आमदारकी ही फक्त ‘दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ’या कारणामुळे राष्ट्रवादीला गेली असून येणाऱ्या दिवसात तालुक्यात भगवा फडकावयाचा आहे. विरोधकांवर टीका करताना सोनवणे म्हणाले की, मी माझ्या काळात कामे मंजूर करून आणली मात्र त्याचे श्रेय विरोधक घेत आहेत. मी विकास कामाचे राजकारण कधीच केले नाही शिवसेनेच्या नादी जो लागेल त्याला तेवढ्यात ताकदीची टक्कर देणार असल्याचे सांगतानाच शिवसेनेपासून दुरावलेल्या जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके पुन्हा माघारी आल्या तर त्यांचे स्वागतच करणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.
यावेळी बाळासाहेब पाटे, धनगरवाडी चे सरपंच महेश शेळके, रशिद इनामदार यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय वाव्हळ यांनी केले तर आभार सरपंच बाबू पाटे यांनी मानले.