नारायणगाव | दुर्गसंवर्धन म्हणजे आपल्या पूर्वजांचा वारसा जतन करणे होय – प्रा.विनायक खोत
दुर्गसंवर्धन म्हणजे आपल्या पूर्वजांचा वारसा जतन करणे होय,
– प्रा.विनायक खोत
पालक-शिक्षक संघाच्या वतीने सबनीस विद्यालयात “वारसा जुन्नरचा” व्याख्यानाचे आयोजन.
नारायणगाव :- (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
“आमचे पूर्वज किती महान होते हे जोपर्यंत तुम्ही समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटणार नाही. त्यासाठी आपल्या पूर्वजांचा इतिहास समजून घ्या. किल्ले आपल्या पूर्वजांचा इतिहास सांगतात, दुर्गसंवर्धन म्हणजे आपल्या पूर्वजांचा वारसा जतन करणे होय, जुन्नर तालुक्यातील गिरिदुर्ग,स्थळदुर्गांची माहिती समजून घ्या. प्रत्येक किल्ल्याचा इतिहास, किल्ल्याची बांधणी, किल्ल्यावरील राज्यकर्ते शासक, त्यांचा कालावधी त्यामध्ये झालेली स्थित्यंतरे हे सर्व समजून घेणे म्हणजे जुन्नरचा वारसा समजून घेणे होय “.
असे मनोगत प्रसिध्द दुर्गसेवक, शिवनेरभूषण प्रा.विनायक खोत यांनी व्यक्त केले.
नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाचे गुरुवर्य रा. प.सबनीस विद्यामंदिर पालक संघ,रोटरी क्लब नारायणगाव यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या “वारसा जुन्नरचा” या व्याख्यानात ते बोलत होते.
यावेळी ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीरत्न अनिलतात्या मेहेर,गटशिक्षण अधिकारी अनिता शिंदे, रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप गांधी,मंगेश मेहेर, मुख्याध्यापिका व पालक संघाच्या अध्यक्षा अनुराधा पुरानिक,उपमुख्याध्यापक सतीश तंवर,पर्यवेक्षक रतीलाल बाबेल, विलास शिंदे,सुषमा वाळिंबे,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कल्पना डुंबरे, पालक संघाच्या सचिव अनुपमा पाटे, उपाध्यक्ष परशुराम वारुळे,मंदार पाटे,महेश मोरे,मधुकर जाधव,विद्या सहाने,वंदना नेहेरकर,जयश्री कोल्हे, माधुरी बनकर इत्यादी मान्यवरांसह पालक,शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“जुन्नर मधील नाणेघाटातील सर्वात मोठा शिलालेख हा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी सर्वात मोठा पुरावा ठरत आहे, ब्राम्ही लिपी मध्ये असणारा हा शिलालेख विद्यार्थ्यांनी समजून घ्यावा,महाराष्ट्राच्या अस्तित्वाच्या खुणा सांगणाऱ्या बहुतांश लेण्या या जुन्नर मध्ये आहेत ,त्याच्या अभ्यासासोबत येथील विविध काळातील ऐतिहासिक स्थापत्य कला समजावून घेणे म्हणजेच जुन्नरचा वारसा जतन करणे होय.असेही यावेळी दुर्गसेवक प्रा.विनायक खोत यांनी सांगितले.
ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर यांनी यावेळी बोलताना सांगितले की ” विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जपली पाहिजे,त्यासाठी शाळेच्या समृद्ध ग्रंथालयाचा आपण वापर करावा.वक्तृत्व स्पर्धां सारख्या विविध स्पर्धा या व्यक्तिमत्व विकासासाठी पूरक ठरतात.अशा स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग घ्यावा. जागतिकीकरणामध्ये विद्यार्थ्यांनी टिकून राहण्यासाठी ग्रामोन्नती मंडळ विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी अभ्यास विषयक करार करीत आहे ” असेही श्री.मेहेर यांनी सांगितले.
यावेळी चालू शैक्षणिक वर्षामध्ये निवृत्त होणारे मुख्याध्यापिका अनुराधा पुराणिक,पर्यवेक्षक रतिलाल बाबेल आणि प्रयोगशाळा सहाय्यक मारुती कोल्हे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्या आला.तसेच शिक्षक पालक संघ आयोजित वक्तृत्व स्पर्धा,रोटरी क्लब नारायणगाव आयोजित चित्रकला स्पर्धा आणि जुन्नर तालुका आंतरशालेय नाट्य स्पर्धा यांमधील यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक सतीश तंवर यांनी केले अहवाल वाचन सचिव अनुपमा पाटे यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रमेश शेटे,रागिणी शिंदे, वनिता ढवळे यांनी केले व आभार प्रा.मधुरा काळभोर यांनी मानले.