लातूरच्या राजकारणात खळबळ; अमित देशमुख भाजपत जाणार ?
दि. १२/०१/२०२३
पिंपरी
पिंपरी : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि माजी मंत्री अमित देशमुख काँग्रेस सोडून भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.
लातूरकर आणि नांदेडकर कधीही फडणवीसांच्या मांडीवर जाऊन बसतील. प्रकाश आंबेडकरांनी अशोक चव्हाण आणि अमित देशमुख यांच्याबद्दल केलेल् भाकित आता खरं होणार का ? शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपाने एकत्र सत्ता स्थापन केली. तेव्हापासून महाराष्ट्रातील राजकारणात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख हे भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान भाजपात अनेकजण प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यात लातूरच्या प्रिन्सची सुद्धा इच्छा झाली आहे. पण, लातूरमध्ये ऑक्सिजन नव्हतं तेव्हा प्रिन्स शहराबाहेर होते. आता सत्तेवर राहण्यासाठी आणि आपण केलेली चुकीची काम लपवण्यासाठी भाजपात यायचं म्हणत आहेत. असं भाष्य माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलंय.निलंगेकर यांच्या या वक्तव्यानं लातुरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
लातुरच्या राजकारणात देशमुख घराण्याचं मोठं वर्चस्व आहे. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते. लातुर जिल्ह्यात देशमुख घराण्याला मोठा जनाधार लाभला आहे. मात्र आता अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं वक्तव्य निलंगेकर यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यावर अमित देशमुख काय प्रत्युत्तर देणार ? हे महत्वाचं ठरेल.
दरम्यान अमित देशमुखांच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील मोठं विधान केलं. येत्या काही काळात भाजपात अनेक दिग्गज नेते प्रवेश करणार आहेत. लवकरच हे बॉम्बस्फोट होतील, असं सूतोवाच बावनकुळे यांनी दिलेत. मात्र अमित देशमुखांनी कमळ हाती घेतल्यास हा काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो.