प्रतिनिधी
पिंपरीःगत राजवटीत पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार झाला,त्यातून आशिया खंडातील ही श्रीमंत महापालिका कर्जबाजारी केली गेली,असा हल्लाबोल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गत सत्ताधारी भाजप व त्यांचे कारभारी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यावर नुकतीच केली.त्यानंतर राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी,तर हा कारभारीच बदला,अशी साद पिंपरी-चिंचवडकरांना शुक्रवारी (ता.९) घातली.त्यातून राष्ट्रवादीनंतर शिवसेनेच्याही रडारवर भाजपचे आ.लांडगे आल्याचे दिसून आले.
पिंपरी महापालिकेतील कामांत भ्रष्टाचार,निविदेत रिंग,रस्ते कामात गैरप्रकार,कुत्रे नसबंदीत घोटाळे,डांबरी रस्त्यावर सिमेंट,लाच प्रकरणात स्थायी समिती अध्यक्षाला अटक,कोयता गॅंगचा हैदोस अशा अनेक गोष्टी उद्योगनगरीत घडल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांच्या या राजवटीवर काही बोलणार नाही.पण,यात सुधारणा करण्यासाठी शहरातील कारभारी बदला,असे आवाहन शिवसेनेचे मुख्य नेते,उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचार सभेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग व्दारे पिंपरी-चिंचवडकरांना केले.पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांची शहरात मुकाई चौक,कि
वळे येथील सभेत त्यांनी हा आसूड ओढला.पुण्यातील सभांना उशीर झाल्याने आणि लोहगाव विमानतळावरून सायंकाळनंतर हेलिकॉप्टर उड्डाणास मर्यादा येत असल्यामुळे ते ठाणे व मुंबईच्या पुढील सभांसाठी रवाना झाले. दरम्यान,त्यांनी किवळ्यात जमलेल्या श्रोत्यांशी मोबाईल फोन व्हिडिओ कॉलींगद्वारे संवाद साधला.
शहरात बदल,परिवर्तन घडविण्याची,कारभारी बदलण्याची वेळ आली आहे,असे शिंदे यावेळी म्हणाले.कोणाला घाबरू नका आणि बिनधास्त लढा,असे आवाहन त्यांनी केले.त्यांचा रोख हा पुन्हा आ.लांडगेंकडे होता.आपण
उपमुख्यमंत्री म्हणून पिंपरी-चिंचवडसाठी काय केले आणि काय कऱणार हे त्यांनी सांगितले.आमची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची असल्याने तिला कोणीही हलक्यात घेऊ नये,असा इशारा दिला.एकदा तिच्या हाती सत्ता द्या,विकासाचे कुलूपच उघडतो,असे ते म्हणाले.त्याचवेळी शहरात भगवे वादळ आले असून शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत असेल,असा दावाही त्यांनी केला.
एक पक्ष दुसऱ्यावर आणि दुसरा पक्ष त्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करत असून त्यांच्यात भ्रष्टाचाराबाबत स्पर्धा लागली आहे,असा टोला यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी नाव न घेता भाजप व राष्ट्रवादीला लगावला.या स्पर्धेत
शिवसेनेला उतरायचे नसून शहरातील भ्रष्टाचार दूर करायचा आहे,असे ते म्हणाले.त्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक निवडून द्या,असे आवाहन त्यांनी केले.राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत,उपनेते इरफान सय्यद,सुलभा उबाळे, महानगरप्रमुख राजेश वाबळे, जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विश्नजीत बारणे, जिल्हा संघटक बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख नीलेश तरस, जिल्हा संघटिका शिला भोंडवे आदी यावेळी व्यासपीठावर होते.

