अजितदादा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री,तर चंद्रकांतदादा भाजपचे जिल्हा संपर्कमंत्री

आपला पालकमंत्री नसलेल्या राज्यातील१७ जिल्ह्यात भाजपने का नेमले संपर्कमंत्री ?

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः महायुतीमध्ये यावेळी सरकार स्थापनेपासून पालकमंत्रीपद नियुक्तीपर्यंत मंत्री कोणाला करायचे आणि कोणाला कोणते खाते द्यायचे यावरून मोठा घोळ आणि त्यातून विलंब झाला. दरम्यान, सर्वाधिक जागा मिळाल्याने आपला वरचष्मा वरचेवर दाखविण्याचा प्रयत्न भाजपकडून ,महायुतीत सुरु आहे.त्यातून त्यांनी आपला पालकमंत्री नसलेल्या १७ जिल्ह्यात आपले संपर्कमंत्री नेमल्याने त्याची मोठी चर्चा सुरु आहे.दरम्यान, त्यांच्या या खेळीमुळे पुणे जिल्ह्याला अजितदादा (पवार) पालकमंत्री,तर ते न मिळाल्याने काहीसे नाराज झालेले चंद्रकांतदादा (पाटील)संपर्कमंत्री असे दोन दादा मिळाले आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि पक्ष वाढीसाठी भाजपने ही चाल खेळली आहे. तसेच पालकमंत्रीपद न मिळालेल्या मंत्र्यांची नाराजीही त्यातून दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.प्रत्यक्षात महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन मित्रपक्ष आणि त्यांच्या पालकमंत्र्यांवर लक्ष ठेवण्याचा खरा हेतू यामागे भाजपचा आहे.नाकापेक्षा मोती जड होऊ न देण्याची खेळी आहे.त्याबद्दल राष्ट्रवादी आणि शिवसेनेत नाराजी आहे.पण,युती आणि सत्तेत असल्याने ती त्यांना बोलून दाखवता येत नाही. राष्ट्रवादीच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या बोलण्यातून त्याला दुजोरा मिळाला.दरम्यान,पालकमंत्री नेमणुकांतून सुरु झालेला वाद शमला नसून उलट तो वाढला असताना संपर्कमंत्री नेमून भाजपने त्यात आणखी भर टाकली आहे. रायगड आणि नाशिकचे पालकमंत्रीपद नियक्तीनंतर लगेच रद्द झाले असून तेथे अद्याप नवीन नियुक्ती झालेली नसतानाच आपले वर्चस्व दाखवून देण्यासाठी भाजपने ही नवी चाल केली आहे.त्यातून त्यांनी दोन्ही मित्रपक्षांना चेकमेट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.अजितदादांसारख्या इतर काही आक्रमक पालकमंत्र्यांवर अंकुश ठेवण्याचा हेतूही त्यामागे असल्याची चर्चा आहे.

आपलाही माणूस असावा म्हणून भाजपने संपर्कमंत्री नेमले असावेत,अशी प्रतिक्रिया त्यावर अजित पवार राष्ट्रवादीचे पिंपरी- चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष योगेश बहल यांनी दिली.पक्षवाढीचाही हेतू त्यामागे असावा,असे ते म्हणाले. असेच मत त्यांच्या पक्षाचे शहर कार्याध्यक्ष फजल शेख यांनी व्यक्त केले.भाजपचे हे पक्षवाढीचे धोरण असावे,पालकमंत्री म्हणून डावललेल्यांना खूष करण्याचा प्रयत्नही असावा,असे ते म्हणाले.त्यातूनच पंकजा मुंडेंना बीडचे संपर्कमंत्री केले गेले आहे.अशीच धूर्त चाल भाजप तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा केली.आतापर्यंत परिवहन मंत्री हेच राज्य परिवहन महामंडळ म्हणजे एसटीचे अध्यक्ष होते.त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू आक्रमक नेते परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हे एसटीचे अध्यक्ष होते.त्यांनी आपल्या स्टाईलनुसार ध़डाक्यात निर्णय घेणे सुरुही केले होते.पण,आता त्याला लगेच कोलदांडा घालण्यात आला.कारण त्यांचे हे अध्यक्षपद काढून ते आता फडणवीसांनी आपल्या विश्वासातील सनदी अधिकारी अप्पर मुख्य सचिव संजीव सेठी यांच्याकडे दिले आहे.भाजपची वर्चस्वाची ही चुणूक भविष्यातही त्यांच्या मित्रपक्षांना पहावी नाही,तर झेलावी लागणार असल्याची ही नांदी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *