पोटनिवडणूक आम्ही बिनविरोध होऊ देणार नाही; पंढरपूरच्या पराभवाचा वचपा काढणारच – नाना काटे

पिंपरी, दि. २२ –

चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होऊ नये तसेच घड्याळ चिन्हावरच लढावे, असा प्रचंड बहुमताचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकारणीत नुकताच करण्यात आला. याच विषयावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब आणि राज्याच्या विधानसभेचे विरोधीनेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांना पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (दि.२१) प्रत्यक्ष भेटून त्याबाबत आम्हा कार्यकर्त्यांच्या भावना किती तीव्र आहेत तेसुध्दा सांगितले. बिनविरोध होणार नाही, असे खुद्द अजितदादांनी काल पत्रकारांशी बोलताना स्पष्ट सांगितले. अशा परिस्थितीत पूर्वी आमदार लक्ष्मण जगताप हे राष्ट्रवादीतच होते आणि त्यांनी पक्षासाठी मोठे काम केले म्हणून माणुसकिच्या भावनेतून बिनविरोध निवडणुक व्हावी, अशी भावना आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली आहे. लोकशाहित मतप्रदर्शन करण्याचा अधिकार आहे, यात दुमत नाही. मात्र, हाच जर का निकष लावायचा असेल तर मग पंढरपूर, मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भालके यांचे निधन झाले होते त्यावेळी भाजपला महाराष्ट्रातील राजकीय परंपरा दिसली नाही का, त्यावेळी माणुसकी कुठे गेली होती, असा रोखठोक सवाल माजी विरोधीपक्षनेते नाना काटे यांनी प्रसिध्दीपत्रकातून उपस्थित केला आहे. पंढरपूर-देगलूर पोटनिवडणुकित कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म, असा सवाल काटे यांनी भाजपला केला आहे. सर्व ताकदिनीशी ही निवडणूक लढणारच, असा निर्धार राष्ट्रवादीने केल्याचे त्यांनी पुन्हा पुन्हा स्पष्ट केले.

पोटनिवडणूक आम्ही बिनविरोध होऊ देणार नाही, पंढरपूरच्या पराभवाचा वचपा काढणारच, असा निर्धार व्यक्त करून नाना काटे पत्रकात म्हणतात, भाजपला इतर पक्ष संपवायचे आहेत. त्यांना विरोध कऱणाऱ्यांना ते ईडी, सीबीआयचा धाक दाखवून गप्प करतात. आजवर महाराष्ट्रात चार पोटनिवडणुका झाल्या. पंढरपूर-देगलूर, कोल्हापूर नंतर अंधेरी (मुंबई) च्या निवडणुका आमदारांच्या निधनामुळे झाली. भाजपने सत्तेसाठी वाट्टेल ते असा खाक्या घेतल्याने काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आणि नेते हे त्यांच्यासाठी दुष्मन आहेत. पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीचा आमदारांचे निधन झाले त्यावेळी त्यांनी ते औचित्य दाखवले नाही. अंधेरी च्या पोट निवडणुकित शिवसेनेला सुध्दा छळले. अशा परिस्थितीत आता चिंचवड आणि कसबा येथील आमदारांचे निधन झाले म्हणून त्यांना परंपरा, सभ्यता आठवते. भाजप हा अत्यंत संकुचित, जातीयवादी, मतलबी, स्वार्थी मनाचा राजकीय पक्ष आहे. वैचारिकदृष्ट्या भाजपची विचारधारा आम्हा पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांना बिलकूल मान्य नाही. त्यामुळे बिनविरोध विसरा, आता पंढरपूरचा बदला घेण्यासाठी राष्ट्रवादीचे सैन्य सज्ज आहे.

 

आमदार बनसोडे यांनी त्यांची भावना व्यक्त केली. पवारसाहेबांनी दिलेल्या संस्कारामुळेच ते तसे बोलले. आम्हीसुध्दा त्यांचा आदर करतो, पण पंढरपूर,देगलूरला वेगळा न्याय आणि चिंचवडला वेगळा न्याय असे होत नाही. निश्चितच आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्याबद्दल आम्हालाही प्रचंड सहानुभूती आहे, त्यांचे राष्ट्रवादीसाठीचे योगदान आम्ही कदापि विसरणार नाही. २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे खोटेनाटे आरोप करून महापालिकेतील सत्ता भाजपने खेचून घेतली. तो पराभव विसरता येणार नाही. चिंचवडची पोटनिवडणूक ही आता राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्वाची लढाई आहे. महापालिकेत भ्रष्टाचाराचे थैमान घालणाऱ्या भाजपला आम्ही कदापि मोकाट सोडणार नाही. आता राष्ट्रवादी कार्यकर्ता पेटून उठला आहे. महापालिकेत झालेल्या अपमानाचा, पराभवाचा बदला घेतल्या शिवाय आम्ही कार्यकर्ते आता शांत बसणार नाही. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचा जो आदेश येईल त्यानुसार आम्ही काम करू. आता फक्त लढायचे आणि जिंकायचे हेच ध्येय आमच्यापुढे आहे, असे नाना काटे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *