धर्माच्या नावाखाली चालविलेले ढोंग भाजपने थांबवावे : विद्या चव्हाण

दि. ०५/०१/२०२३
पिंपरी


पिंपरी : हिंदू धर्म धोक्यात असल्याचे भासवत भाजप मोर्चे काढत आहे. हे धर्माच्या नावाखाली चालविलेले ढोंग भाजपने थांबवावे. त्यागाचे प्रतीक असलेला भगवा भाजपच्या अशा कृत्यांमुळे भोगाचे प्रतीक झाला आहे अशी टिका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा, माजी आमदार विद्या चव्हाण यांनी गुरुवारी थेरगाव येथे केली. आजकालच्या मुली चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींचे अनुकरण करतायत. त्यामुळे उत्तान कपडे घालण्याची फॅशन आलीय. हिंदी चित्रपट सृष्टीमुळे देश बिघडला आहे असेही त्या म्हणाल्या.

महागाई आणि वाढत्या बेरोजगारी विरोधात महिला राष्ट्रवादीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात राबविली जाणारी जनजागर यात्रा गुरुवारी पिंपरी चिंचवड शहरात आली. पिंपरी, भोसरीमध्ये कोपरा सभा होणार आहे. तत्पूर्वी थेरगाव येथे चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निरीक्षक डॉ. आशा मिरगे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर मंगला कदम, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, सुनील गव्हाणे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, वर्षा जगताप आदी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाल्या, देशात-महाराष्ट्रात प्रचंड महागाई वाढली आहे. तरुणांच्या हाताला रोजगार नाही. याकडील जनतेचे लक्ष्य विचलित करण्यासाठी भाजपकडून कोण, कोणते कपडे घालते. कोण कोणाला काय म्हटले असे विषय काढले जातात. धर्माधर्मात भांडणे लावली जात आहेत. हिंदू धर्म धोक्यात असल्याचे सांगत भगवी वस्त्रे परिधान करून मोर्चे काढले जात आहेत. भाजपने धर्माच्या नावाने सुरू केलेले ढोंग थांबवावे. महागाई कमी करावी. तरुणांच्या हाताला रोजगार द्यावा. शेतक-यांच्या शेतमालाला भाव द्यावा यासाठी आम्ही जनजागर यात्रा काढली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *