धर्मवीर म्हणा किंवा स्वराज्यरक्षक त्यावरून वाद करण्याची गरज नाही!; शरद पवार यांच्या विधानामुळे अजितदादांची पंचाईत

दि. ०४/०१/२०२३
मुंबई


मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केलेल्या विधानानंतर भारतीय जनता पक्षाने राज्यात ठिकठिकाणी आंदोलने करून राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. माध्यामांनीही हा विषय सतत चर्चेत ठेवल्यामुळे अजितदादांची अडचण झाली. एव्हढे पुरेसे नव्हते म्हणून की काय आता दस्तुरखुद्द शरद पवार यांनी संभाजी महाराजांना धर्मवीर म्हटलं तरी चुकीचं नाही; असे म्हणून अजित पवार यांची अडचण करून ठेवली आहे. दरम्यान अजित पवार यांनी नुकतेच माध्यमांशी बोलताना आपले विधान बरोबर असल्याचे म्हटले आहे. य सर्व प्रकारामुळे साहेब आणि दादा यांच्यातील विसंवाद अधोरेखित झाला आहे.

संभाजी महाराजांना धर्मवीर बोललं तरी चुकीचं नाही असं शरद पवार म्हणाले आहेत.ठाण्यात काही नेत्यांची नावं धर्मरक्षक अशी दिसून येतात. धर्मवीर काय किंवा धर्मरक्षक काय ? ज्यांना धर्मवीर म्हणायचं त्यांनी धर्मवीर म्हणावं, ज्याला स्वराज्य रक्षक म्हणायंच त्यांनी स्वराज्य रक्षक म्हणावं. राज्याचं रक्षण करण्याचं त्यांनी महत्त्वाचं काम केलं त्याची नोंद आपण घेतली तर त्याची नोंद घेतल्यास चुकीचं नाही. त्याच्यावरून वाद करण्याची गरज नाही. महापुरुषांवरून अकारण वाद नको असेही शरद पवार म्हणाले.जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर मात्र शरद पवार यांनी बोलणं टाळलं. अजित पवार अधिवेशनात बोलले ते मी ऐकलं.पण इतरांवर बोलण्याची गरज नाही असं म्हणत शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाबत केलेल्या वक्तव्याच्या प्रश्नाला बगल दिली.

शरद पवार यांच्या या विधानामुळे अजितदादा यांची गोची झाल्याचे चर्वितचर्वण सध्या माध्यमातून सुरू आहे. आता पवारसाहेब पुन्हा कुठला गुगली टाकतात आणि अजितदादा तो कसा टोलवतात हे लवकरच कळेल.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *