दलबदलुंचं राजकारण महाराष्ट्र मान्य करत नाही; ग्रामपंचायत निवडणुकीवर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
२१ डिसेंबर २०२२
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. तर दुसरीकडे या गोंधळा दरम्यान राज्यातील एकूण ७ हजार ७८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा आतापर्यंत जिंकल्या आहे. त्यावरच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिथे गड आहे तिथे राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिथे गड आहेत तिथे त्यांचे उमेदवार आणि काँग्रेसचे गड आहेत, तिथे काँग्रेसेचे उमेदवार निवडून आले आहेत. महाराष्ट्रातील आकडेवारी जर आपण पाहिली, तर अधिकृत घोषित झालेल्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जवळपास १३०० ग्रामपंचायतींवर निवडून आलेला आहे आणि महाविकास आघाडीचे इतर दोन घटक पक्ष जर धरले तर जवळपास २६५१ ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकलेला आहे.
शिवसेना(शिंदे गट) आणि भाजपा यांचा मिळून साधारणपणे २२०० ते २३०० ग्रामपंचायतींवर झेंडा फडकेलाल आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठ्याप्रमाणात ग्रामीण भागातील जनतेने साथ दिलेली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावातही राष्ट्रवादीचा झेंडा फडकलेला आहे. त्यामुळे हे लक्षात येतं की दलबदलुंचं राजकारण महाराष्ट्र मान्य करत नाही. साम-दाम-दंड भेद वापरून, सत्ता वापरून, सत्तेचा दुरपयोग करूनही आज महाविकास आघाडीचा पराभव हा भाजपा आणि त्यांच्याबरोबरचा शिंदे गट करू शकत नाही. हे पुन्हा एकदा महाराष्ट्रात सिद्ध झालेलं आहे. असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.