श्रद्धा वालकर प्रकरणात राजकीय दबाव दिसून आला नाही – देवेंद्र फडणवीस

२० डिसेंबर २०२२


श्रद्धा वालकर हिने मृत्यूपूर्वी महिनाभर आधी वसई पोलिस स्टेशनमध्ये आफताब आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र काही कारणास्तव ती मागे घेतली. यामागे राजकीय यंत्रणांचा दबाव होता का, असा सवाल विधानसभेत आज अतुल भातखळकर यांनी विचारला आहे.

अतुल भातखळकर म्हणाले, श्रद्धा वालकरची फक्त हत्याच केली गेली नाही, तर तिच्या देहाचे ३५ तुकडे केले गेले. ते तुकडे आफताबनं स्वत:च्या घरात फ्रीजमध्ये ठेवले आणि हळूहलू त्यांची विल्हेवाट लावली. असं म्हटलं गेलं की वसईत राहत असताना तिने २०२०मध्ये पोलिसात तक्रार अर्ज दिला होता. पण नंतर तिने तो अर्ज मागे घेतला. मुळात तिच्या वडिलांनी हे जाहीरपणे सांगितलंय की त्यावेळी पोलिसांवर दबाव होता. आफताबच्या घरच्यांनीही तिच्यावर दबाव आणला होता. त्यामुळे हा अर्ज कदाचित मागे घेतला गेला असेल. पण पोलिसांनी कारवाई केली नाही, यामागे काही राजकीय दबाव होता का?

राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाला उत्तर दिलं. यासंदर्भात राज्यातील पोलीस विभाग तपास करत असून तत्कालीन सरकारी यंत्रणा तसेच राजकीय यंत्रणांचा या प्रकरणात दबाव होता, असे सध्या तरी दिसून येत नाही, असे स्पष्ट शब्दात फडणवीस यांनी सांगितलं. मात्र नेमक्या कोणत्या कारणासाठी श्रद्धा वालकरने ही तक्रार मागे घेतली, याचा तपास पोलीस करत आहेत, अशीही माहिती फडणवीसांनी दिली.


.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *