दिल्ली उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला
१५ डिसेंबर २०२२
शिवसेनेचे चिन्ह ‘धनुषबाण’ गोठविण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मंगळवारी दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर दिल्ली उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला.
ठाकरे गटाची बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल म्हणाले, निवडणूक आयोगाने आमची बाजू न ऐकता आमच्या पक्षाचे चिन्ह गोठविण्यावर शिक्कामोर्तब केलं. इतिहासात यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने निकालात म्हटले होते की, प्राथमिक आक्षेपांवर सुनावणी घेता येणार नाही. उच्च न्यायालयाच्या या टिप्पणीवर आम्हाला स्पष्टीकरण हवे आहे. न्यायालय असे कसे म्हणू शकते? निवडणूक आयोगासमोरही आक्षेप घेण्यात आले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र सुप्रीम कोर्ट म्हणतं की, दोन पक्ष आहेत, पण गट नाहीत, असंही सिब्बल यांनी नमूद केलं.
उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला योग्य ठरविण्याच्या उच्च न्यायालयाच्या एकेरी बेंचच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या एकेरी खंडपीठाने शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाला योग्य ठरवलं होतं.