बेळगाव केंद्रशासित भाग झाला असता तर आम्हाला आनंद झाला असता – संजय राऊत
१५ डिसेंबर २०२२
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर बैठक झाली. यात ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर खासदार संजय राऊत यांनी या बैठकीवर आणि सीमावादावर आपली भूमिका मांडली.
प्रश्न सुप्रीम कोर्टात असताना बेळगावात अधिवेशन कसे घेता? उपराजधानी कशी करू शकता? – संजय राऊत
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर ज्या गोष्टी ठरल्या त्या पुढे मार्गी लागणं गरजेचं आहे. त्या बैठकीत ‘जैसे थे’ परिस्थितीवर एकमत झालं आहे. तसेच न्यायालयाचा जो निर्णय लागेल त्यावर पुढील गोष्टी ठरतील. तोपर्यंत एकमेकांच्या भागावर दावा सांगायचा नाही.मुळात बेळगाव हे महाराष्ट्राचंच आहे. तो दावा सांगण्याचा प्रश्न नाही. दावा कर्नाटकने केला. कर्नाटकने अचानक महाराष्ट्रातील सोलापूर सांगलीमधील गावांवर दावा केला आणि बेळगावचा प्रश्न न्यायालयात आहे.
आमचा प्रश्न हा आहे की, प्रश्न न्यायालयात असताना कर्नाटकने बेळगावला उपराजधानी कशी बनवली? प्रश्न न्यायालयात असताना कर्नाटकने विधानसभा अधिवेशन कोणत्या आधारावर घेतलं? हा न्यायालयाचा अवमान आहे. मुळात कर्नाटकने बेळगावमध्ये अधिवेशन घेणं बंद केलं पाहिजे. बेळगाव केंद्रशासित भाग झाला असता तर आम्हाला आनंद झाला असता, असंही राऊत म्हणाले.