सीमा प्रश्न श्राद्ध उरकल्याप्रमाणे दोन मिनिटात आटोपता; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

१३ डिसेंबर २०२२


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांची गुजरातमध्ये झालेल्या भेटीवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.

राऊत म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई रस्त्यावर भेटले असं ऐकलं. रस्ता ही काय सीमाप्रश्न सोडवण्याची जागा आहे का? जाता जाता, चालता चालता, कॉफी शॉपमध्ये, एअरपोर्ट लॉनमध्ये, एअरपोर्टच्या लॉबीत भेटण्याची जागा आहे का? सहज भेटले म्हणून बोलले, मात्र हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. सहज दोन मुख्यमंत्री गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला गेले, जाता येता भेटले आणि सीमा प्रश्नावर चर्चा झाली. इतका सीमा प्रश्न कमी महत्त्वाचा, खालच्या दर्जाचा आहे का? असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी समजून घेतलं पाहिजे की, कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रावर हल्ला करत आहेत, बदनामी करत आहेत, धमकी देत आहेत आणि तुम्ही सहज चालता चालता भेटत आहात आणि चर्चा करत आहात. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यांनी हे बाहेर तरी सांगू नये. ज्या प्रश्नावर लोक ५५-६० वर्षे संघर्ष करत आहेत, लढत आहेत, शहीद होत आहेत, मान-अपमान सहन करत आहेत तो प्रश्न तुम्ही श्राद्ध उरकल्याप्रमाणे दोन मिनिटात आटोपता. मला या सरकारच्या प्रसिद्धी विभागाचं आश्चर्य वाटत आहे,असंही राऊतांनी नमूद केलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *