पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांच्या पाठीवर थाप मारली ती बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडल्याबद्दलची शाबासकी असावी – संजय राऊत
१२ डिसेंबर २०२२
महाराष्ट्राच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या विकासासाठी महत्त्वाच्या अशा ११ ताऱ्यांचा उल्लेख केला. पंतप्रधानांच्या ११ ताऱ्यांपैकी महत्त्वाच्या ताऱ्यांचा अपमान होतोय, त्यावर कुणीच काही बोलत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
संजय रयत म्हणाले, महाराष्ट्राला विकासाचे ११ तारे आम्ही देतोयत, असं पंतप्रधान म्हणाले. त्यातला पहिले दोन तारे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे हे आहेत. त्या दोन्ही ताऱ्यांचा अवमान झालाय. छत्रपती शिवाजी महाराज हे तारे नाहीतच. ते प्रखर सूर्य आहेत. त्या सूर्यावर थुंकणारे त्या व्यासपीठावर होते. ताऱ्यांच्या कशाला गप्पा मारतायत? आम्हाला वाटलं, राज्याचे मुख्यमंत्री चिंतामणराव देशमुखांप्रमाणे पंतप्रधानांना विचारतील की महाराष्ट्राचा अपमान करणारे व्यक्ती व्यासपीठावर असताना तुम्ही कसे आलात?.
पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांच्या पाठीवर थाप मारली. ती थाप बहुधा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडल्याबद्दलची शाबासकी असावी. किंवा जे औरंगजेबाला जमलं नाही, जे आम्हाला जमलं नाही, तो तुम्ही खंजीर खुपसून दाखवला, त्याबद्दल ही थाप होती का? असे प्रश्न जनतेच्या मनात आहे, असं राऊत म्हणाले. समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या फलकांवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो चौथ्या क्रमांकावर होता. ही सरकारची बेफिकिरी आहे. महाराष्ट्र हा स्वाभिमान, अभिमान, शौर्यासाठी प्रसिद्ध आहे. त्या महाराष्ट्राच्या नशीबी हे काय आलंय? असा सवालही राऊत यांनी केला.