गुजरातच्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

०८ डिसेंबर २०२२


गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने आतापर्यंतचे सारे विक्रम मोडीत काढत विजयाची सप्तपदी पूर्ण केली. १८२ जागांपैकी १५६ जागा जिंकल्या आहे. मागील वेळी ७८ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यावेळी मात्र दारुण पराभव पत्करावा लागला. त्यांना अवघ्या १७ जागाच मिळविता आल्या; तर आम आदमी पार्टीला केवळ ५ जागा मिळविता आल्याने त्यांचा दिल्ली पॅटर्न निष्प्रभ ठरला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झालाय. भाजपच्या या विजयाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेयांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. गुजरातचा विजय विक्रमी आणि ऐतिहासिक आहे. गुजरातबरोबरच हिमाचल प्रदेश विधान सभेचे निकाल लागले व तेथे काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. तर दिल्ली ‘मनपा ‘ निवडणुकीत ‘आप’ने भाजपवर मात केली. याबद्दलही ठाकरे यांनी काँग्रेस व आपचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

गुजरात विजयाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, गुजरातचा निकाल अपेक्षितच होता. गुजरात निवडणूक ही पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्याच नेतृत्वाखाली लढवण्यात आली. त्यामुळेच जनतेने भाजपला भरघोस मतदान केले. त्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत असे दिसते. पंतप्रधान मोदी हे ११ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात येत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते येथेही भरघोस घोषणा करतील. आपने गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात मतविभागणी करून भाजपचा फायदा घडवून आणला हे देखील स्पष्ट झाले आहे. असो, ज्याचे त्याचे राजकारण सोयीनुसार चालत असते, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावलाय.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *