बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करा; संजय राऊत यांची मागणी
०८ डिसेंबर २०२२
दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय मराठी माणूस आणि महाराष्ट्रातील वाहनांवर बेळगावमध्ये हल्ला होऊ शकत नाही, असा आरोप करीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बेळगावसह सीमाभाग तातडीने केंद्रशासित करण्याची मागणी बुधवारी केली. महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा खेळ सुरू झाला असून बेळगावातील हल्ले हा त्याच कटाचा भाग असल्याचा दावाही त्यांनी केला. ज्या सरकारला राज्याच्या सीमा राखता येत नाहीत, त्या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे. मग महाराष्ट्र सरकार आहे की नाही? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री अमित शहा यांना सीमाप्रश्नी भेटणार आहेत. त्यांना भेटून काय उपयोग? सीमाभागात काय सुरू आहे, हे त्यांना समजत नाही का, असे सवाल करीत महाराष्ट्राचे लचके तोडता यावेत, म्हणूनच शिवसेनेचं सरकार घालविल्याचा आरोप राऊत यांनी केला.