महाराष्ट्राला दिल्लीच्या दारातील पायपुसणं करुन टाकलय – संजय राऊत
०७ डिसेंबर २०२२
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न चिघळत चालला आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ न देण्याची भूमिका घेतलेल्या कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला आहे. बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर कन्नड संघटनांकडून दगडफेक करण्यात आली. याचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. मंत्र्यांचा नियोजित बेळगाव दौराही लांबणीवर गेल्यानं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत महाराष्ट्राला दिल्लीच्या दारातील पायपुसणे करुन टाकलय असे म्हटले आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात तीन महिन्यांपूर्वी क्रांती केली. क्रांती दिसत आहे. महाराष्ट्र इतका लेचा पेचा कधीच झाला नव्हता. तीन महिन्यात महाराष्ट्राचे दिल्लीच्या दारातील पायपुसणे करून टाकले. स्वाभिमानी म्हणून शिवसेना सोडली असे बोलणारे आज तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. हा षंढ पणा आहे. दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा खेळ सुरू झालाय. बेळगावातील हल्ले त्याच कटाचा भाग आहे.ऊठ मराठ्या ऊठ!,असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटल आहे.