महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे – शंभूराज देसाई
०६ डिसेंबर २०२२
बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. शंभूराज देसाई यांनीदेखील या हल्ल्यानंतर निषेध व्यक्त केला असून लवकरच आम्ही ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मांडणार आहोत, असे मत व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र राज्य सामंजस्याची भूमिका घेत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही आमचा बेळगावाचा दौरा पुढे ढकलला. मात्र काहीही कारण नसताना कर्नाटकमधील लोक महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला करत आहेत. या हल्ल्यानंतर सीमाप्रश्न कोणाला चिघळवायचा आहे हे स्पष्ट झाले आहे. या हल्ल्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. या हल्ल्याचा धिक्कार करतो. त्यानंतर आता या घटनेच्या प्रतिक्रिया इतर टिकाणी उमटू नयेत, याची खबरदारी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे. मी आपल्या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचित करणार आहे. महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे,” अशा शब्दांत शंभूराज देसाई यांनी आपला राग व्यक्त केला.