संविधानामुळेच माझ्यासारखा सामान्य माणूस मुख्यमंत्री झाला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
०६ डिसेंबर २०२२
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जगाला दिशा देण्याचं काम केलं आहे. संविधानामुळेच माझ्यासारखा सामान्य कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री झाला, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. समाजातील सर्व घटकांना समान हक्क आणि न्याय मिळावा हीच बाबासाहेबांची भावना होती. सरकार त्यांच्या विचारावरच चालतं आहे, असं देखील मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं आहे.
आज महापरिनिर्वाण दिनामित्त मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. आज आपण केवळ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच जगामध्ये ताठ मानेने उभे आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळे सर्वसामान्यांना अधिकार प्राप्त झाले. त्यांना जगण्याचा हक्क मिळाला. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदावर जाऊ शकला. राज्यातही माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकली. मला राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली. हे केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे शक्य झाले. मी बाबासाहेबांचा शतश: ऋणी आहे. आंबेडकरांनी देशाला, समाजाला दिशा दिली. त्यांनी दुर्बलांना सशक्त करण्याचे काम केले. सामान्य माणूस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. मानवमुक्ती हेच त्याचे धेय्य होते. त्यांनी भारतातीलच नव्हे तर जगभरातील वंचितांच्या हक्कांना, मानवी प्रतिष्ठेला वैचारिक आणि संघटनात्मक बळ दिले. दलित समाजात रुजलेली न्यूनगंडाची भावान काढून टाकली. त्यांनी संघटित होण्यास बळ दिले. शिका संघटित व्हा, असा मूलमंत्र त्यांनी दिला,असे एकनाथ शिंदे म्हणाले.