भाजपमधील छत्रपती प्रेमी, महाराष्ट्र प्रेमींनी एकत्र आलं पाहिजे तशी सुरुवात झाली आहे – उद्धव ठाकरे
०३ डिसेंबर २०२२
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. उदयनराजे यांच्या नेतृत्वात आज ( ३ नोव्हेंबर ) किल्ले रायगड येथे निर्धार शिवसन्मानाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा बोलताना ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांइतकेच त्यांच्या वक्तव्यावर शांत बसणारे दोषी आहेत, असा हल्लाबोल उदयनराजेंनी केला.
उदयनराजेंच्या या वक्तव्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजेचं धन्यवाद मानतो. गेल्यावेळी सांगितलं होतं की, भाजपातील छत्रपती प्रेमी एकत्र यावेत. त्याबाबत सुरुवात झाली आहे. तसेच, महाराष्ट्रातील गद्दारीची तुलना छत्रपतींच्या आग्र्यातील सुटकेशी केली जाते. अजूनही ते मंत्री राहत असतील तर महाराष्ट्र काय आहे, हे दाखवण्याची वेळ आली आहे,असा इशारा उद्धव ठाकरेंनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यावरून दिला.
महाराष्ट्र प्रेमींनी एकत्र आलं पाहिजे. आगामी काळात सुद्धा स्वाभिमानी महाराष्ट्र उभा करण्याची गरज आहे. कारण, मिधें सरकार खुर्चीसाठी दिल्लीश्वरांचे पाय चाटत असेल, तर अभिमान आणि स्वाभिमानाची त्यांच्याकडून अपेक्षा न केलेली बरी, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केला आहे.