ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, बावनकुळेंची निवडणूक आयुक्तांकडे मागणी
०१ डिसेंबर २०२२
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी एक दिवसाची मुदत वाढ द्यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटचा सर्व्हर डाऊन असल्यामुळं उमेदवारी अर्ज भरताना अडचणी येत आहेत. त्यामुळं चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही मागणी केली आहे. बानवकुळे यांनी राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांची भेट घेऊन मागण्यांचे पत्र दिले आहे.
राज्यात सात हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठीचे उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीनं भरायचे आहेत. मात्र, सर्व्हरच्या समस्येमुळं फार मोठ्या संख्येनं उमेदवारी अर्ज दाखल करता येत नाहीत. निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने राज्यभरात गोंधळ उडाला आहे. अर्ज भरण्याची मुदत उद्या (2 डिसेंबर) संपत आहे. अशा स्थितीत हजारो इच्छुक उमेदवार निवडणूक लढवण्यापासून वंचित राहून निवडणुकीची प्रक्रिया निष्पक्ष होण्यास बाधा येण्याची शक्यता असल्याचे बावनकुळेंनी पत्रात म्हटलं आहे.