आता संजय राऊतांचं कमी झालं आणि शरद पवार रोज बोलायला लागले – नारायण राणे
३० नोव्हेंबर २०२२
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पत्रकारपरिषद घेत राज्यात विविध मुद्य्यांवरून मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली आणि भूमिका मांडली. यावेळी राणेंनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी शरद पवार यांनी केलेल्या विधानाचा उल्लेख करत त्यावर प्रतिक्रिया दिली.
नारायण राणे म्हणाले, सध्या महाराष्ट्रात विरोधी पक्षाच्या नेत्यांना सत्ता गेल्याने नैराश्य आलेलं आहे. ते निराश झालेले आहेत, त्यामुळे जनतेत भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंबधी एक धक्कादायक वक्तव्यं केलं आहे. ते मी वाचून दाखवतो बेळगाव, कारवार महाराष्ट्रात पाहिजे असल्यास त्या बदल्यात महाराष्ट्राती काही गावे कर्नाटकास द्यावी.
याचबरोबर शरद पवार चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि आता अडीच वर्ष असल्यासारखे होते. तेव्हा ते महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न संबंधी एकही शब्द बोलले नाहीत आणि तसं काही केलंही नाही. आता मात्र विरोधी पक्षात गेल्यानंतर रोज काहीतरी बोलावसं वाटतं. आता संजय राऊतांचं कमी झालं आणि शरद पवार रोज बोलायले लागले. असंही राणेंनी यावेळी म्हटलं.याशिवाय, शरद पवार तुमचं काही मतं असो परंतु या महाराष्ट्राचं मत महाराष्ट्रातील एकही इंच जागा कर्नाटक काय कुठल्याही राज्याला देऊ नये, असं आहे आणि भाजपाचंही तेच ठाम मत आहे. शरद पवार या वयात महाराष्ट्राला काय योगदान आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. आपण महाराष्ट्राच्या भागाबद्दल चर्चा करायला हरकत नाही परंतु असं बोलू नये, असं मला वाटतं. असं म्हणत नारायण राणेंनी भूमिका स्पष्ट केली.