शिंदे गटात गेलेल्या लोकांना आता पश्चाताप होतोय – सुषमा अंधारे
१६ नोव्हेंबर २०२२
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदेगटाचे नेते दीपक केसरकर यांच्यावर टीका केली आहे. दीपक केसरकर फार गोड बोलतात. ते माझे भाऊ आहेत. पण त्यांना मला एक प्रश्न विचारायचाय. बाळासाहेब ठाकरे यांचं २०१२ साली निधन झालं. त्यानंतर दोन वर्षांनी दीपक केसरकर २०१४ ला शिवसेनेत आले. केसरकर सातत्याने बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर भाष्य करतात. पण मग ते हे हिंदुत्व शिकले कधी? असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे. शिंदेगटाने बंड केल्यानंतर दीपक केसरकर यांनी शिंदेगटाची भूमिका सर्वांसमोर मांडली. यावेळी बोलताना आम्ही हिंदुत्वासाठी भाजपसोबत आलोय, असं म्हणायचे. बाळासाहेबांच्या विचारांचा दाखला द्यायचे. त्यावरून सुषमा अंधारे यांनी त्यांना सवाल केलाय.
गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे या राष्ट्रवादीतून आल्या आहेत असं विधान केलं होतं. त्यावरही अंधारे यांनी भाष्य केलंय. मी कधीही राष्ट्रवादीची सदस्य नव्हते. तरीही गुलाबराव पाटील म्हणतात की, मी राष्ट्रवादीतून आले, असं अंधारे म्हणाल्या आहेत. गुलाबराव पाटील यांना आवरा. शिंदेगटाचे नेते कौटुंबिक पातळीवर जाऊन टीका करत आहेत. मुख्यमंत्री साहेब यांना आवारा असं अंधारे म्हणाल्या आहेत. भाजप कपटी आणि कारस्थानं करणारा पक्ष आहे. शिंदे गट माझा भाऊच आहे. शिंदे गटात गेलेल्या लोकांना आता पश्चाताप होतोय. शिंदेगट भाजपच्या राजकारणाने त्रासला आहे, असंही अंधारे यांनी म्हटलं आहे.